ऐरोली ते काटई रस्त्यावर नवी मुंबईकरांसाठी मार्गिका, आयुक्तांनी घेतली MMRDA अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक

या अनुषंगाने प्रकल्प सल्लागार यांच्यामार्फत एमएमआरडीए अधिकारी यांच्यामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून 3 पर्याय सूचविण्यात आले. त्या पर्यायांवर चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आज विशेष बैठक घेत तिन्ही पर्यायांमधील उपयोगिता आणि अडचणी याविषयी सविस्तर विचारविनिमय केला. विस्तृत चर्चेअंती यामधील एक पर्याय सर्व अंगाने योग्य असल्याचे अनुमान काढत याबाबतच्या पुढील कार्यवाहीसाठी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी यांचे स्तरावर पुढील आठवड्यात बैठक आयोजन करण्यात येणार आहे.

    नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास महामंडळ यांच्यामार्फत ऐरोली ते काटई नाका या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्या मार्गावर असलेल्या पुलाचा वापर नवी मुंबईकर नागरिकांना ठाणे बेलापूर रोडवरून कल्याण – डोंबिवलीकडे जाण्यासाठी व कल्याण डोंबिवलीकडून ठाणे बेलापूर रोडवरून नवी मुंबईत उतरण्यासाठी करण्याकरिता एमएमआरडीएच्या नियोजनात मार्गिका उपलब्ध आहेत.

    तथापि ठाणे बेलापूर रोडवरून मुलुंडमार्गे मुंबईत जाण्यासाठी व मुलुंडकडून ठाणे बेलापूर रोडवर नवी मुंबईत येण्यासाठी आवश्यक असलेली मार्गिका एमएमआरडीए मार्फत नवीन नियोजनात प्रस्तावित करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 4 जानेवारी रोजी एमएमआरडीए अधिका-यांसमवेत विशेष बैठक घेत या मार्गिकेची तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याबाबत सूचित केले होते.

    या अनुषंगाने प्रकल्प सल्लागार यांच्यामार्फत एमएमआरडीए अधिकारी यांच्यामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून 3 पर्याय सूचविण्यात आले. त्या पर्यायांवर चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आज विशेष बैठक घेत तिन्ही पर्यायांमधील उपयोगिता आणि अडचणी याविषयी सविस्तर विचारविनिमय केला. विस्तृत चर्चेअंती यामधील एक पर्याय सर्व अंगाने योग्य असल्याचे अनुमान काढत याबाबतच्या पुढील कार्यवाहीसाठी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी यांचे स्तरावर पुढील आठवड्यात बैठक आयोजन करण्यात येणार आहे.

    या बैठकीप्रसंगी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता  प्रकाश भांगरे, पालिकेचे शहर अभियंता  संजय देसाई, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता  गुरुदत्त राठोड व सुपरिटेन्टेंट इंजिनिअर  जतीन साखळकर, पालिकेचे कार्यकारी अभियंता संजय खताळ तसेच प्रकल्प सल्लागार आकार अभिनव कन्सल्टन्ट चे व्यवस्थापकीय संचालक अमोल खेर व महाव्यवस्थापक किशोर कोटकर उपस्थित होते.

    नवी मुंबईतील घणसोली, रबाळे, ऐऱोली, दिघा परिसरातील वाहन चालकांना कल्याण – डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करण्यासाठी प्रामुख्याने शिळफाटा – महापे मार्गाने वळण घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतून कल्याण – डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करताना घ्यावा लागणारा मोठा वळसा टाळण्यासाठी ऐरोली – काटई नाका अशा उन्नत आणि भूमिगत मार्गाची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जात आहे. या मार्गाचा उपयोग ठाणे बेलापूर रोडवरून मुंबईकडे व कल्याण – डोंबिवलीकडे येण्या-जाण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकांना पूर्ण क्षमतेने व्हावा याकरिता महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांच्यामार्फत सातत्याने पाठपुरावा सुरु असून एमएमआरडीए व महापालिकेच्या संबंधित अधिका-यांची नियमित बैठक घेत या कामाला गती दिली जात आहे.