अल्पसंख्याक विकास विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना आहाराकरीता मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रोख रक्कम : नवाब मलिक

अ, ब आणि क वर्ग महापालिका तसेच विभागीय शहरातील वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम ३ हजार ५०० रुपये तर जिल्हा व तालुकास्तरावरील वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम ३ हजार रुपये देण्यात येणार आहे, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असून चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

    मुंबई : अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतीगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये राहणाऱ्या व उच्चशिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराकरीता रोख रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

    विद्यार्थ्यांना मासिक रक्कम ३ हजार ५०० रुपये

    अ, ब आणि क वर्ग महापालिका तसेच विभागीय शहरातील वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम ३ हजार ५०० रुपये तर जिल्हा व तालुकास्तरावरील वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम ३ हजार रुपये देण्यात येणार आहे, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असून चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

    आहाराकरीता रोख रक्कम थेट बँक खात्यात

    राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, ज्यू व पारशी समाजातील उच्चशिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृह योजना राबविण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची राज्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्रे असलेल्या शहरांमध्ये राहण्याची सुविधा झाली आहे, पण अनेक विद्यार्थ्यांना कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना भोजन व इतर खर्च करणे शक्य होत नाही, त्यामुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये तसेच त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून आता त्यांच्या आहाराकरीता रोख रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

    अल्पसंख्याक मुला-मुलींनी योजनेचा लाभ घ्या

    या योजनेच्या लाभाकरीता विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक असून त्या बँक खात्याशी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक संलग्न करणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक समाजातील मुला-मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.  वसतीगृहविषयक योजना तसेच आपल्या परिसरातील वसतीगृहांच्या माहितीसाठी अल्पसंख्याक विकास विभागाच्या https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.