राज्यात शाळा, महाविद्यालयं दिवाळीनंतर सुरु? टास्क फोर्स सकारात्मक तर अजित पवार म्हणाले की…

शाळा आणि महाविद्यालयं पूर्णपणे कधी सुरु होणार याकडे राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागून आहे. यासंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

    मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शाळा आणि महाविद्यालयं बंद आहेत. शाळा आणि महाविद्यालयं पूर्णपणे कधी सुरु होणार याकडे राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागून आहे. यासंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

    अजित पवार नेमकं काय म्हणाले?

    आज मुंबईत बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात 2 ऑक्टोबर पर्यंत कोरोनाची परिस्थिती बघायची. त्यानंतर कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेता येऊ शकतो. शाळांबाबत लहान मुलांच्या लसी आल्या की त्यांचे लसीकरण करायचे आणि दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची आमची मानसिकता आहे. तेव्हा त्याबाबत मुख्यमंत्री आढावा घेतील, असं अजित पवार म्हणाले.

    …तर दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास कोविड टास्क फोर्स सकारात्मक

    राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतर 20 दिवस कोरोनाची स्थिती पाहून तिसऱ्या लाटेची साधारण शक्यता पाहून यावर निर्णय घ्यावा, अशा सूचना पेडीएट्रिक टास्क फोर्सने राज्य सरकराला दिल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबत आधी सुद्धा पेडीएट्रिक टास्क फोर्स सकारात्मक होते, मात्र शाळा कधी सुरू कराव्यात याबाबत त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लसीकरण पूर्ण झाल्यास व ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचं पालन करण्यासाठीची तयारी पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरू करण्यात याव्यात असं मत मांडले होतं.

    दरम्यान शिक्षण विभागाने आता लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती मागवली असून शाळा सुरू करब्याबाबत पूर्वतयारी सुद्धा केली जात आहे.मुंबई महापालिका शिक्षण विभागाने सुद्धा शाळा सुरू करण्याबाबतचा नियोजन सुरू ठेवला आहे. मुंबईत शाळा सुरू करण्याचा निर्णय हा आयुक्त घेतील आणि जर दिवाळी नंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला तर तो सर्व बोर्डाच्या शाळांसाठी लागू असेल, अशी देखील माहिती आहे.

    मात्र, शाळा कधी सुरू कराव्यात ? याबाबत एकवाक्यता नसल्याने यावर टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचा विचार करून राज्य सरकार कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिली तर नक्कीच दिवाळी नंतर शाळा सुरू करण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर जरी शाळा सुरू करण्याची शक्यता असली तरी विविध जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेतील.