मुख्यमंत्र्यांच्या पत्राने दुखावलेल्या राज्यपालांची मनधरणी, ज्येष्ठ मंत्री राजभवनात जाऊन व्यक्त करणार दिलगिरी

मुख्यमंत्र्यांच्या पत्राने (Chief Minister Uddhav Thackeray Letter To Governor Bhagatsingh Koshyari) दुखावलेल्या राज्यपालाची मनधरणी करण्यासाठी आणि या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे शिष्टमंडळ (Senior Leaders In Raj Bhavan) लवकरच राज्यपालांना भेटून दिलगिरी व्यक्त करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    मुंबई : विधानसभा अध्यक्षाच्या (Assembly Speaker Election) निवडीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Chief Minister Uddhav Thackeray Letter To Governor Bhagatsingh Koshyari) दुखावले गेले आहेत. त्यांनी काल सकाळी लिफाफाबंद उत्तर पाठवले त्यातील मजकूर माध्यमांतून बाहेर आला आहे. या पत्रात राज्यपालांनी पत्राची धमकीवजा भाषा पाहून मी दु:खी, निराश झालो, माझ्यावर तुम्ही दबाव आणू शकत नाही अश्या शब्दांत खंत व्यक्त केल्यानंतर ठाकरे सरकार नरमल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या पत्राने दुखावलेल्या राज्यपालाची मनधरणी करण्यासाठी आणि या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे शिष्टमंडळ (Senior Leaders In Raj Bhavan) लवकरच राज्यपालांना भेटून दिलगिरी व्यक्त करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    उपमर्दकारक भाषेमुळे राज्यपाल व्यथित
    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांनी म्हटले आहे मुख्यमंत्र्याचे पत्र त्यांना पाच वाजता मिळाले आणि केवळ तासाभरात त्यावर कायदेशीर मत घेवून उत्तर देणे शक्य नव्हते, मात्र मुख्यमंत्र्याच्या पत्रात ‘नको त्या उद्योगात पडू नका, अशा शब्दात राज्यपालांचा उपमर्दकारक भाषेत उल्लेख करण्यात आला होता. त्यावर राज्यपाल व्यथित झाले आहेत.

    राज्यपालांनी नंतर त्यावर स्पष्ट भूमिका घेतली की, ‘तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी १० ते ११ महिन्याचा वेळ घालवला. महाराष्ट्र विधानसभा नियम सहा आणि सातमध्ये सुधारणा करण्यात आली. अशाप्रकारे या दुर्गम सुधारणांचे परिणाम कायदेशीररित्या तपासले जाणे आवश्यक आहे. मी सभागृहाचा कार्यपद्धती आणि कार्यवाहिच्या बाबतीत त्याच्या विशेष अधिकारावर कधीही प्रश्न उपस्थित केले नाही. पण प्रथम दर्शनीय दिसणाऱ्या प्रक्रियेस संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही. घटनेच्या अनुच्छेद २०८मध्ये नमूद केल्यानुसार असंवैधानिक आणि बेकायदेशीर असणे राज्यपालांच्या सर्वोच्च घटनात्मक कार्यालयाची अवहेलना आणि बदनामी करण्याच्या तुमच्या पत्रांचा संयमी स्वर आणि धमकीवजा शब्द पाहून मी व्यक्तीरित्या दुखी आणि निराश झालो आहे, असे राज्यपालांनी म्हटल्याचे या सूत्रांनी सांगितले.

    माझ्यावर तुम्ही कोणताही दबाव आणू शकत नाही
    राज्यपालांनी म्हटले आहे की, कोणताही निर्णय घेण्यासाठी अशा प्रकारे माझ्यावर दबाव आणणे योग्य नाही. मी संविधानाचा रक्षक आहे. मला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो योग्य असला पाहिजे. सर्व बाबींचा विचार करून मला निर्णय घ्यावा लागतो. यासाठी माझ्यावर तुम्ही कोणताही दबाव आणू शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या पत्रात संविधानाच्या अनुच्छेद २०८चा उल्लेख करत विधिमंडळाने नियम बदलल्याचा उल्लेख केला आहे. त्यावरही कायदेशीर भाषेत त्यांनी उत्तर देताना ‘प्रथम दर्शनीय तुमचा निर्णय २०८ नुसार नाही. तो असंवैधानिक आहे. घटनाबाह्य आहे. म्हणून या घडीला मला या बदलाला अनुमती देता येणार नाही. तुम्ही केलेले बदल हे बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे,’ असे कळवले आहे.

    रविवारी नापसंती व्यक्त केली
    त्यापूर्वी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवडीतील राज्यपालांच्या अधिकारांना कात्री लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे राज्यपाल संतप्त झाले आहेत. त्याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे रविवारी नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यपालांचा काल (दि २९) रोजी खुलासा आल्यानंतर आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घाई न करता राज्यपालांच्या संमंतीनेच यासंदर्भात निर्णय घेण्याची सूचना केली. त्यामुळे येत्या दोन दिवसांत राज्यातील ज्येष्ठ मंत्र्याचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून त्यांची दिलगीरी व्यक्त करण्याची शक्यता आहे. गुरूवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी या संदर्भात निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे असे या सूत्रांनी स्पष्ट केले.

    कौरवसभेत वस्त्रहरण होताना धृतराष्ट्राप्रमाणे पहात बसावे लागले असते
    राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्याची स्वाक्षरी होती मात्र त्यांचा स्वभाव पाहता हे पत्र त्यांनी न वाचताच स्वाक्षरी केली असावी, असे वाटते अशी प्रतिक्रिया यासंदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली, शेवटच्या दिवशी विधिमंडळात मुख्यमंत्री आले नाहीत कारण विद्यापीठ कायद्यासंदर्भात कौरवसभेत लोकशाहीचे वस्त्रहरण होताना त्यांना धृतराष्ट्राप्रमाणे पाहात बसावे लागले असते अशा मार्मिक शब्दात फडणवीस यांनी भावना बोलून दाखवल्या.