Shivsena NCP contreversy: Shiv Sena leaders infiltrate Mahavikas Aghadi! It's time to dump her and move on

दर महिना पंधरा दिवसांनंतर शिवसेनेच्या कुठल्यातरी भागातील नेत्यांची घुसमट बाहेर येताना दिसते आहे. मात्र तरीही तिन्ही पक्षातील नेते मात्र अनेकदा एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात. एकीकडे काही नेते महाविकास आघाडी झाल्याने समाधान व्यक्त करत असताना दुसरीकडे काही नेते मात्र खदखद व्यक्त करत आहेत. नुकतेच मराठवाड्यात शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली असून महाविकास आघाडीत शिवसैनिकांचे नुकसान होत असल्याचे जाहीर वक्तव्य केले आहे(Shivsena NCP contreversy: Shiv Sena leaders infiltrate Mahavikas alliance! Attempt by NCP to end Shiv Sena).

    भाजपसोबत युती तोडण्यापूर्वी उध्दव ठाकरे यांनी प्रसिध्द विधान केले होते. युतीमध्ये शिवसेना २५ वर्ष सडली असे ते म्हणाले होते. मात्र आता दोन वर्षाच्या मविआच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीने पक्षाचा घात केला असा सूर अनेकदा अनेक नेते आळवू लागले आहेत. राज्यात दोन वर्षापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा तात्कालिक प्रश्न निकाली लागल्याचे दिसत असले तरी शिवसेनेच्या नेत्यांच्या आणि जिल्हा, तालुका, गावपातळीवरच्या सैनिकांमध्ये अजूनही या आघाडीचा निर्णय रूजला आणि पचला नसल्याचे वारंवार दिसून येत आहे(Shivsena NCP contreversy: Shiv Sena leaders infiltrate Mahavikas Aghadi! It’s time to dump her and move on).

    राष्ट्रवादीकडून शिवसेना संपविण्याचा घाट

    मागील दोन वर्षात अश्या प्रकारे शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी बोलणे हे काही पहिल्यांदा घडले नाही. सर्वात प्रथम ठाण्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यानी जाहीर पत्र लिहून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना इशारा दिला होता की ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या लोकांकडून शिवसेना संपविण्याचा घाट घातला जात आहे. मात्र त्यानंतर फारसे काही घडले नाही मातोश्रीवरून या विषयावर ठोस असे काही उत्तर आल्याचे दिसले नाही. त्यानंतर वेळोवेळी शिवसेनेचे मराठवाड्यातील संजय शिरसाट, किंवा विदर्भातील आशिष जयस्वाल, किंवा अगदी नुकतेच पत्रकार परिषद घेवून आक्रमक झालेले रामदास कदम यानी राष्ट्रवादीकडून पक्ष संपविण्याच्या कारवाया सुरू असल्याचा सूर लावला आहे. या मध्ये पक्षात काल परवा आलेल्या काही नेत्यांची देखील फूस असल्याचा आरोप कदम यानी केला आहे.

    अग अग म्हशी मला कुठे नेशी

    तसे पाहता केवळ भाजपची जिरवण्याच्या नादात शिवसेनेच्या नेतृत्वाला आता महाविकास आघाडीचा हा सौदा ‘अग अग म्हशी मला कुठे नेशी’ असा महागात पडल्याचे लक्षात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यातून बाहेर पडणे देखिल फार सोपे नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पद आणि उद्योग उच्च शिक्षण कृषी पर्यावरण पर्यटन अश्या फुटकळ खात्यांची सत्ता मिळवताना मिळालेल्या मंत्री पदातील चतकोरसुध्दा आपल्या मुळे निष्ठावान कार्यकर्त्याना मिळेल याची काळजी घेतली नसल्याचे दिसून आले आहे. शंकरराव गडाख, उदय सामंत, बच्चू कडू, यांच्यासह ठाकरेच्या घरातच मुख्यमंत्रीपदासह महत्वाची अन्य खाती देण्यात आल्याने सत्ता मिळूनही शिवसैनिकाला फारसे काही मिळालेच नाही पण उध्दव ठाकरे यानी मात्र बाळासाहेबांना दिलेल्या शब्दासाठी सारे काही होत असल्याचे सांगत त्यावेळी निष्ठावंताना शांत केल्याचे दिसून आले आहे.

    स्वाभिमानासह अस्तित्वालाही नख लागण्याची वेळ

    मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आल्या आहेत. वाघाचे पिल्लू मांजर म्हणून फार दिवस पाळता येत नाही याचा अनुभव शिवसेनेला झाला आहे. ज्यांच्या विरोधात वर्षानुवर्ष निवडणुका लढल्या त्या वैचारिक विरोधकांसोबत जागा वाटप करताना स्वत:च्या स्वाभिमानासह अस्तित्वालाही नख लागण्याची वेळ आली तेव्हा हे पाळलेले पिलू वाघाचे आहे मांजरीचे नाही याची जाणिव पक्षातील नेत्यांना झाली आहे. नेतृत्वालाही ती झाली असली तरी आता कड्यावरून पळून जाण्यासाठी दोर कापून टाकले आहेत. राज्यात जनता दल, समाजवादी पक्ष यांच्यासह समाजवादी कॉंग्रेस आणि पुरोगामी समाजवादी चळवळीच्या जश्या छोट्यामोठ्या संस्था, पक्ष आणि नेत्यांना शरद पवार आणि त्यांच्या राजकारणाने गिळंकृत केले तसा काहीसा प्रकार शिवसेनेसोबतही होण्यास सुरूवात झाली आहे असे राजकीय जाणकार मानतात. मात्र याबाबत शिवसेनेच्या नेत्यांना जाग कधी येते आणि मुळात  आली तरी यातून मार्ग काढता येते का हे पाहणे महत्वाचे आहे.