काँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे  : नाना पटोले

स्वबळाच्या मुद्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी ही आमची भूमिका नाही असे मत मांडल्याबद्दल विचारले असता पटोले यांनी स्पष्ट केले की, प्रभारींनी तशी भूमिका मांडलीच नाही. ते म्हणाले की,“विधानभा निवडणुका किंवा लोकसभा निवडणुकांविषयी दिल्लीत निर्णय होतात असे प्रभारीना  म्हणायचे होते.

    मुंबई : महाविकास आघाडीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा कलगीतुरा गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाहायला मिळत आहे. आघाडीत बिघाडी असल्याचे चित्र राज्यात दिसू लागले आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या ना-याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी परखड शब्दांत सुनावल्यानंतर कॉंग्रेसकडून नमते घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना “काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंसोबत पूर्ण ताकदीनिशी आहे. काँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे”, असे म्हटले आहे.
     
    भाजपला थांबविण्यासाठी सरकारमध्ये
    ते म्हणाले की, “ या आधीचे सरकार ५ वर्ष चालले, त्यावेळी देखील ते प्रत्येक ठिकाणी स्वबळावर चालत होते तरी ते सरकार चालले. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हे सरकार निर्माण करताना एकच भूमिका मांडली होती की, भाजपला थांबविण्यासाठी या सरकारमध्ये सामील झालो आहोत. त्यामुळे आम्ही पर्मनंट आहोत असा उल्लेख त्यावेळी कुठेही केला नव्हता. उद्धव ठाकरे जे बोलले, ते शिवसेना प्रमुख म्हणून बोलले आहेत. मुख्यमंत्री म्हणून बोलले नाहीत. त्यांची एक ठाकरे शैली आहे, भाषा आहे. मी त्या दोघांची (भाजपा आणि शिवसेना) भाषा निवडणुकीच्या वेळी ऐकली आहे कोणत्या पातळीवर गेली होती. त्यामुळे आज आम्ही म्हणतो की, त्यांचा नेमका इशारा कोणाकडे आहे ते कळले पाहिजे”, असे नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.

    प्रभारीच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ नको
    स्वबळाच्या मुद्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी ही आमची भूमिका नाही असे मत मांडल्याबद्दल विचारले असता पटोले यांनी स्पष्ट केले की, प्रभारींनी तशी भूमिका मांडलीच नाही. ते म्हणाले की,“विधानभा निवडणुका किंवा लोकसभा निवडणुकांविषयी दिल्लीत निर्णय होतात असे प्रभारीना  म्हणायचे होते. काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. काँग्रेस लढणार आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात होत आहे. काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेस स्वबळावर लढेल”, असे नाना पटोले म्हणाले.