
सामनाच्या अग्रलेखात सरनाईकांच्या पत्रावर भाष्य करताना म्हटले आहे की, ‘महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना विनाकारण त्रास देण्याचे उपदव्याप सुरुच आहेत. आता या अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकाने करायला हवा आहे.
मुंबई : न्याय-अन्यायाची पर्वा न करता लढत राहाणारा शिवसैनिक हेच शिवसेनेचे ‘बळ’ आहे, अश्या शब्दात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राला आज सामनाच्या अग्रलेखातून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे सरनाईक यांच्या त्या पत्रातील हवा काढून घेतल्याचे मानले जात आहे.
शिवसेना निखारा म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जतन केली
सामना च्या अग्रलेखात म्हटले आहे की, ‘शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा नाहीतर परिणामांस सामोरे जा, अशा दाबदबावाला बळी न जाता शिवसेनाप्रमुखांनी स्वाभिमानाने शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले. म्हणून आजची शिवसेना तेजाने तळपताना दिसत आहे. ही शिवसेना निखारा म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जतन करून ठेवली. म्हणून आजही सामान्यातल्या सामान्य तरुणांना आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदे भोगता आली. कोणत्याही त्रासाची, छळाची, न्याय-अन्यायाची पर्वा न करता लढत राहाणारा शिवसैनिक हेच शिवसेनेचे ‘बळ’ आहे,’ असेही अग्रलेखात म्हटले आहे.
जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?
सामना मध्ये सरनाईकांच्या त्या पत्रातील मजकूराला उत्तर देताना म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांशी जुळवून घेतलेच आहे. मुळात वाकडे-तिकडे काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?, असा सवाल करतानाच विनाकारण त्रास असा काही नाहक प्रकार सुरु असेल तर पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र पाठवता येईल, असे मत सामनातून व्यक्त करण्यात आले आहे.
याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकाने करावा
सामनाच्या अग्रलेखात सरनाईकांच्या पत्रावर भाष्य करताना म्हटले आहे की, ‘महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना विनाकारण त्रास देण्याचे उपदव्याप सुरुच आहेत. आता या अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकाने करायला हवा आहे.
ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच
सामना ने म्हटले आहे की, ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा विनाकारण त्रास होत आहे. त्रास टाळायचा असेल तर भाजपशी किंवा थेट मोदींशी जुळवून घ्या, अशा आशयाचे एक पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले आहे. सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात इतर बरेच विषय मांडले आहेत. ते त्यांचे वैयक्तिक मत असेल. एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले यावर प्रतिक्रिया द्यावी असे खास काहीच नाही, पण या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असे काहींना वाटत आहे.
ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच म्हणायला हवेत,’ ‘सरनाईकांच्या पत्राचा ताजा कलम इतकाच आहे की, महाराष्ट्रात भाजपने सत्ता गमावली या चिडीतून महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे. एका केसमध्ये जामीन मिळाला की तत्काळ दुसऱ्या केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवले जात आहे, असेही सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे.
त्यांच्या या संपूर्ण पत्रातील ‘विनाकारण त्रास’ हाच शब्द व त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत,’ असे म्हणत सामना ने त्यातील नेमक्या मुद्याला हात घातला आहे. त्यामुळे सरनाईक यांच्यासह शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या मंत्री आणि आमदारांना राजकीय हेतूने लक्ष्य केले जात असल्याच्या मुद्यावर बोट ठेवत सामना ने शिताफीने या विषयातून मुख्यमंत्र्याना बाजूला करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.