मुंबईत मागील सप्ताह जोरदार हायप्रोफईल राजकीय प्रशासकीय घडामोडींचा राहिला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शस्त्रक्रिया आणि बावीस दिवसांच्या उपचारांनंतर वर्षा निवासस्थानी घरवापसी, राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना केंद्राने मुदतवाढ नाकारल्याने शेवटच्या क्षणी सेवाज्येष्ठता क्रमानुसार देबाशिष चक्रवर्ती यांच्या हाती देण्यात आलेली सूत्र. त्यानंतर कुंटे यांना मुख्यमंत्र्याच्या सल्लागार पदी देण्यात आलेली नियुक्ती, आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधी बाजूनेही राजकीय धुरळा अश्या खचाखच घडामोडी पहायला मिळाल्या(Week of high profile political and administrative developments in Maharashtra!).
ममतांच्या भेटीचे महत्व आणि कवित्व
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मात्र मुंबई दौ-यात झालीच नाही. मुख्यमंत्र्यांवर अलिकडेच झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याना प्रत्यक्ष भेटीगाठी करण्यास डॉक्टरांची अनुमती नसल्याने दोघां नेत्याची भेट होईल की नाही याबाबत साशंकता होती आणि अखेर ममता यांना खा संजय राऊत आणि पार्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीवरच हा किस्सा संपवावा लागला. मात्र शिवसेनेच्या नेत्यांच्या या भेटीनंतर त्यांचा जुना मित्र भाजपच्या नेत्यांच्या तिखट प्रतिक्रिया आल्याच.
भाजप नेत्यांची राजकीय गोची
प.बंगालच्या ममता बॅनर्जींच्या भाजपविरोधी राजकारणाचे सामना मध्ये नेहमीच कौतुक केले जाते त्यामुळे ज्येष्ठ शिवसेना नेत्यांसह आदित्य ठाकरे यांची ममता बँनर्जी भेट चर्चेत येण्याची शक्यता खरी ठरली. ममता बॅनर्जींच्या मुंबई दौ-यात महत्वाच्या व्यावसायिक तसेच नागरी समुहातील मान्यवरांच्या भेटीगाठीही झाल्या आहेत. येत्या एप्रिल २०२२ मध्ये पश्चिम बंगालमध्ये बंगाल ग्लोबल बिझनेस समिट आहे. त्यानिमित्ताने ममता बॅनर्जी मुंबईतल्या बड्या व्यावसायिकांना निमंत्रण देण्यासाठी भेटल्यातर भाजपने राज्याचे उद्योग पळविण्याचा करार केल्याचा आरोप केला. मात्र दुस-याच दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल देखील मुंबइत आले आणि त्यांनी व्हायब्रंट गुजरातसाठी राज्यातील उद्योजकाना गुजरातला येण्यासाठी निमंत्रण दिले त्यानंतर आघाडीच्या नेत्यानी शेलार यांच्यावर पलटवार केले आणि भाजपच्या नेत्यांची राजकीय गोची करण्याचा प्रयत्न केला!
तिसरा घटकपक्ष कॉंग्रेसची तिव्र प्रतिक्रिया
दरम्यान भाजप विरोधात असणाऱ्या सर्वांना एकत्र घेऊन यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बँनर्जी यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रातील कार्यक्रमात राहुल गांधी याचे नाव न घेता टिका करताना विदेशात राहून कसे चालेल? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीतील तिसरा घटकपक्ष कॉंग्रेसमधून तिव्र प्रतिक्रिया आल्या. त्या पहाता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न देखील केल्याचे पहायला मिळाले.
नेहमीप्रमाणेच वर्क फ्रॉम होम
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या सप्ताहात रुग्णालयातून घरवापसी झाली. एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यासाठी २२ दिवसापासून त्यांच्यावर रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनात शस्त्रक्रिया आणि उपचार सुरु होते. चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यान दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याने तुर्तास ते नेहमीप्रमाणेच वर्क फ्रॉम होम करत आहेत.
रुग्णालयात असतानाही काम सुरुच
उद्धव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया गिरगावातील एच. एन. रुग्णालयात करण्यात आली. तरीदेखील ओमायक्रॉन वेरीयंट म्युटेशनची शक्यता आणि गांभिर्य लक्षात घेत मुख्यमंत्र्यानी मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत, रूग्णालयातूनही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन उपस्थिती लावली होती हे विशेष म्हणावे लागेल. रुग्णालयात असतानाहीत्यांनी काम सुरुच ठेवले होते.
मुदतवाढीच्या प्रस्तावावर राज्य सरकारची कोंडी
या सा-या धामधुमीत प. बंगलाच्या मुख्य सचिवांबाबत जसा प्रकार केंद्र आणि त्या राज्या दरम्यान झाला तसाच काहीसा अनुभव राज्यातही पहायला मिळाला. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला सांयकाळी संपला तरी त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर केंद्राकडून मंजूरीची मोहर काही उमटली नाही. अंतिम क्षणापर्यंत प्रतिक्षा करण्यात आल्यानंतर अखेर कुंटे यानी निवृत्ती स्विकारत कार्यभार देवाशिष चक्रवर्ती यांच्याकडे सोपविला आहे. राज्यात सध्या अधिका-यांच्या बदल्यांसंदर्भात कथित घोटाळ्यांच्या आरोपांच्या सीबीआय आणि केंद्र सरकार कडून चौकश्या सुरू आहेत. त्यातच कुंटे यांना जबाब नोंदविण्यासाठी पाठविण्यात आलेल्या समन्सला त्यानी प्रतिकूल प्रतिसाद दिला होता. अश्यातच कुंटे यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीच्या प्रस्तावावर राज्य सरकारची कोंडी झाली.
महत्वाची प्रकरणे हाताळण्याची नव्याने संधी
हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरु होते. मात्र ३० तारखेच्या कार्यालयीन वेळ संपेपर्यत सीताराम कुंटे यांच्या ३ महिन्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला नाही. मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर सीताराम कुंटे यांचे रश्मी शुक्ला प्रकरणात माजी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि अन्य अधिका-यांशी असलेले संबंध दुरावल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे सरकारसोबत त्यांचे चांगले संबंध असलेतरी केंद्रातील भाजपशी जवळचे संबंध असलेल्या अधिका-यांशी त्यांचे संबंध फारसे चांगले राहिले नाहीत. त्यातच सध्या बदली घोटाळ्याच्या चौकशी संदर्भात सीबीआय सोबत संबंध ताणले गेल्याने तीन महिन्यांची मुदतवाढीच्या राज्य सरकारच्या शिफारशीला मंजूरी देण्यात अडचणी होत्या अशी माहिती या सूत्रानी दिली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव नाकारला असून देवाशिष चक्रवर्ती यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे. असे असले तरी कुंटे यांना मुख्यमंत्र्याचे सल्लागार म्हणून विशेष नियुक्ती करण्यात आलकी आहे, मुख्यमंत्र्याना प्रकृतीच्या कारणास्तव विश्सासु सहकारी हवाच आहे त्यामुळे आता कुंटे यांना महत्वाची प्रकरणे हाताळण्याची नव्याने संधी मिळणार आहे.