रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक रंगणार! बँकेची निवडणूक बिनविरोध होणार नाही – माजी खासदार निलेश राणे

“किती वर्ष तानाजी चोरगे बँकेचे अध्यक्ष राहणार आहेत. चोरगेंनी बँकेचा सगळा पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरला. जिल्ह्यातील कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे बॅनर कधी दिसले का? रत्नागिरी जिल्ह्यावर एवढी संकटं आली शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेने स्वतःहून किती मदत केली? अनेक वादळे आली चिपळूणमध्ये नुकसान झालेल्या लोकांसाठी बँक धावली का? बँकेने किती रुपयांची मदत केली हे जाहीर करावे.” - माजी खासदार निलेश राणे

    रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक आता तोंडावर आहे. जिल्हा बँके आपल्याच ताब्यात रहावी यासाठी आता कोकणातील नेते निवडणूकीच्या तयारीला लागले आहे. याच निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत “रत्नागिरी जिल्ह्याची बँक असताना सगळा पैसा पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना दिलेला आहे. येत्या दोन दिवसांत जिल्हा बँकेचे गैरव्यवहार पुराव्यासहित पत्रकार परिषदेत उघड करणार” असल्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

    यापुढे बोलताना राणे म्हणाले की, “अनेक लोकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. पण, काही लोकांनी स्वतःच्या मनमानी कारभारावर ही निवडणूक बिनविरोध होणार झाल्याची घोषणा केली. निवडणूकीत भाजपला दोनच जागा देण्यात आल्या आहेत. यात आम्ही तरी समाधानी नाही. दुसरे पॅनेल उभे केले जाणार असून दुसर्‍या पॅनेलला पूर्ण मदत करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. पक्षाने कारवाई केली तरी चालेल. नंतर पक्षाला काय उत्तर द्यायचं ते देईन.” असेही माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.

    “किती वर्ष तानाजी चोरगे बँकेचे अध्यक्ष राहणार आहेत. चोरगेंनी बँकेचा सगळा पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरला. जिल्ह्यातील कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे बॅनर कधी दिसले का? रत्नागिरी जिल्ह्यावर एवढी संकटं आली शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेने स्वतःहून किती मदत केली? अनेक वादळे आली चिपळूणमध्ये नुकसान झालेल्या लोकांसाठी बँक धावली का? बँकेने किती रुपयांची मदत केली हे जाहीर करावे.”

    “तानाजी चोरगे जिल्हा बँकेची मालमत्ता स्वतःची असल्यासारखेच वापरत असून त्यांना त्यांच्या हो ला हो म्हणणारी माणसे हवी आहेत. त्यांना प्रश्न विचारणारी माणसं नकोत. नवीन लोक बँकेत आली तर यांचा भ्रष्टाचार लोकांसमोर येईल ही भीती आहे.”

    “जिल्हा बँकेचा फायदा शेतकऱ्यांना झालाच नाही. शेतकरी गरीबच राहिला. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे ऊठसूट दुसऱ्यांना देत बसले आहेत. जिल्हा बँकेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत येत्या दोन दिवसात पुराव्यासहित पत्रकार परिषद घेणार असल्याचेही” माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.

    जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी सर्वच पक्षातील लोकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असून याबाबत दुसऱ्या पॅनलची तयारी सुरू असल्याचेही माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.