
श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी मूर्ती संवर्धन प्रक्रियेबाबत कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी श्रीपुजकांच्या वकिलांनी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने मूर्तीसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप केला.
कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई (Ambabai) मूर्तीची झीज झाल्याचे समोर आल्यानंतर राज्य पुरातत्त्व विभागाकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी केंद्रीय पुरातत्त्व विभागानेही मूर्तीची पाहणी केली होती. मात्र, विभागाने पाहणी करताना श्री अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड (Ambabai Idol Tampering) झाल्याचा आरोप श्री पूजकांच्या वकिलांनी केला आहे. लेपाच्या थराचा काही भाग काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे म्हटले आहे. या संदर्भात देवीच्या मूर्तीची दोन छायाचित्रे कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी मूर्ती संवर्धन प्रक्रियेबाबत कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी श्रीपुजकांच्या वकिलांनी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने मूर्तीसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप केला. कोणत्याही परवानगी शिवाय चेहऱ्यावर यापूर्वी लावलेला लेपाचा काही थर काढून टाकला. तो काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा जास्त खराब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा दावा श्री पूजकांच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे मूर्ती संवर्धन प्रक्रियेबाबत आता वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, श्री अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा काही प्रमाणात झीज झाल्याने राज्य पुरातत्व विभागाकडून 28 फेब्रुवारी रोजी पाहणी करण्यात आल्यानंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाला पत्र पाठवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकारी राजेश्वरी, शिवन्नाकुमार, राम निगम, उत्तम कांबळे यांनी मूर्तीची मंगळवारी पाहणी केली. केंद्रीय पुरातत्त्व विभाग याविषयीचा अहवाल सादर करेल. या अहवालानंतर संवर्धनासंदर्भात पुढील निर्णय होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. दरम्यान, पाहणीनंतर सांगण्यात आले की मूर्ती सुरक्षित आहे. काही प्रमाणात संवर्धनाची गरज भासल्यास त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, अशी माहिती केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
तत्पूर्वी, 28 फेब्रुवारीला राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी याबाबतचा अहवाल पाठवल्यानंतर केंद्रीय पुरातत्त्वची पाहणी झाली. दरम्यान मूर्ती संवर्धनाबाबत आता तरी कुठलाही खेळखंडोबा करु नये, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली आहे.