
महाराष्ट्रातील 60 कारागृहांमध्ये कैद्यांना शिक्षणाची सुविधा दिली जात आहे. यावर्षी किमान 145 कैदी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. अशा परिस्थितीत त्याची ९० दिवसांची शिक्षा कमी होणार आहे.
सध्या महाराष्ट्रातील अनेक कारागृहात कैद्यांना (Maharashtra prisoner) शिक्षणासाठी प्रेरित करण्यात येत आहे. याच कारण म्हणजे कारागृहात शिक्षण पुर्ण केल्यानंतर येथील कैद्यांना शिक्षेत सुट देण्यात येत आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील दोन कैदी देवानंद आणि विजय यांनी बी.ए.ची परिक्षा उत्तीर्ण होत 90 दिवसांची विशेष सूट मिळवली, यामुळे त्यांच्या शिक्षेचा कालावधी कमी झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, त्यांना एमए कोर्स पूर्ण करण्यासाठी ९० दिवसांची आणखी एक विशेष सूट मिळावली आहे. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे इतर कैद्यांनाही आता शिक्षण पूर्ण करुन शिक्षा कमी करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
नेमका प्रकार काय?
देवानंद आणि विजय नावाच्या दोन कैद्यांना खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती. 2020 मध्ये या दोघांनी बीएची परीक्षा उत्तीर्ण केली होती त्यामुळे त्यांना 90 दिवसांची सूट देण्यात आली आहे. या दोन्ही कैद्यांनी यावर्षी एमएची परीक्षाही उत्तीर्ण केली असून त्यामुळे त्यांना एकूण ६ महिन्यांची सूट ( prisoner gets early release) मिळाली आहे. त्यांच्या लवकर सुटकेसाठी मिळालेल्या सूटमुळे प्रभावित होऊन तुरुंगातील अनेक कैदी आता पदवीचा अभ्यास करण्यात व्यस्त झाले आहेत. एक दशकाहून अधिक काळ तुरुंगात असलेले कैदी आता कारागृहात पदव्युत्तर शिक्षण घेऊ लागले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक कैद्यांना मिळाली प्रेरणा
महाराष्ट्रातील कारागृहात गेल्या तीन वर्षांत 145 कैदी आहेत ज्यांनी हायस्कूल, इंटरमिजिएट, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. महाराष्ट्रातील 10 कारागृहांमध्ये कैद्यांसाठी शिक्षण केंद्रे चालवली जात आहेत. अधिकारी म्हणतात की तुरुंगात असताना अभ्यास केल्याने कैद्यांना एक उद्देश मिळतो.अनेकजण तरुण वयात तुरुंगात जातात. अशा परिस्थितीत त्यांचे शिक्षणही चुकते. त्यांना हवे असल्यास ते तुरुंगातही शिक्षण सुरू ठेवू शकतात. त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना सुटकेनंतर नोकरीही मिळू शकते.
शिक्षणातून पदवी घेतल्यानंतरही उपजीविकेचे साधन शोधणे सोपे असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त डीजीपी अमिताभ गुप्ता यांच्या मते, तुरुंगातून सुटल्यानंतर समाजात एकरूप होण्यात आणि कुटुंबाची काळजी घेण्यात शिक्षणाची मोठी भूमिका असते. आणि शिक्षण त्यांना गुन्हेगारीपासून दूर ठेवते. महाराष्ट्र कारागृह नियम 1962 नुसार महाराष्ट्रातील 60 तुरुंगांमध्ये शिक्षेत सवलत दिली जाऊ शकते. 2019 मध्ये 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडी, एमफिल केलेल्यांना 90 दिवसांची विशेष सूट मिळेल असे परिपत्रक जारी करण्यात आले होते.
याशिवाय जेलरची इच्छा असेल तर तो ६० दिवसांची अतिरिक्त सूटही देऊ शकतो, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. मात्र, ही सूट अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यावरच मिळू शकते. तीन वर्षात नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ६१ कैद्यांना ही सुविधा मिळाल्याचे आकडेवारी सांगते. एका महिलेने नागपूर कारागृहात पदव्युत्तर शिक्षणही केले. कारागृहात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ आणि यशवंता चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण दिले जाते. यासाठी एका शिक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
तुरुंग प्रशासनाचे म्हणणे आहे की, एखादा कैदी सुशिक्षित असेल तर तो इतर कैद्यांनाही शिकवतो. 8 वर्षांत किमान 2200 कैदी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. बहुतेक कैदी बीए, एमए, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, हिंदी, मराठी करतात. याशिवाय कैदी ६ महिन्यांचा कोर्सही करतात. अनेक कैद्यांनी कारागृहात एमबीएही केले आहे.