लेकीचा मृतदेह वडिलांना घेऊन जावा लागला खांद्यावर, बीडमधील मन हेलावून टाकणारी घटना

संतापजनक घटना गेवराईच्या भोजगावमध्ये समोर आली आहे. आत्महत्या केलेला 18 वर्षीय मुलीचा मृतदेह वडिलांना खांद्यावर घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे.

    बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ग्रामस्थांच्या रस्त्याविना मरणयातना सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी खराब रस्त्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एक दुर्दैवी आणि संतापजनक घटना गेवराईच्या भोजगावमध्ये समोर आली आहे. आत्महत्या केलेला 18 वर्षीय मुलीचा मृतदेह वडिलांना खांद्यावर घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील भोजगावमधील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निकीता दिनकर संत असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

    मयत निकिता संत हिचा मृतदेह उमापूर येथील रुग्णालयात नेत असताना, भोजगाव परिसरातून वाहणाऱ्या अमृता नदीवरील पूल वाहून गेल्याने सुरुवातीला हा मृतदेह बैलगाडीतून घेऊन गेले. मात्र पुढे बैलगाडी देखील जात नसल्याने, चक्क नदी ओलांडण्यासाठी वडिलांना आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जावा लागलाय.

    गेल्या अनेक महिन्यांपासून पूल दुरुस्तीची मागणी करूनही पूल दुरुस्त केला नसल्याने ग्रामस्थांतून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान गेवराईच्या चोरपूरी येथील रस्त्याने महिलेचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच या भोजगावच्या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेनंतर तरी स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला जाग येणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.