गोरेगाव आग दुर्घटनेतील जखमींची मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून विचारपूस

गोरेगाव पश्चिम उन्नतनगर येथील जय भवानी इमारतीला आज (दिनांक ६ ऑक्टोबर २०२३) आग लागली होती. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या आगीच्या घटनेमध्ये जखमी झालेल्या रूग्णांची हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय रुग्णालय व डॉ. रु.नं. कूपर रुग्णालयामध्ये भेट घेऊन विचारपूस केली.

    मुंबई : गोरेगाव पश्चिम उन्नतनगर येथील जय भवानी इमारतीला आज (दिनांक ६ ऑक्टोबर २०२३) आग लागली होती. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या आगीच्या घटनेमध्ये जखमी झालेल्या रूग्णांची हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय रुग्णालय व डॉ. रु.नं. कूपर रुग्णालयामध्ये भेट घेऊन विचारपूस केली. रूग्णालयातील जखमींच्या भेटीनंतर प्रत्यक्ष घटनास्थळाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल उपस्थित होते.

    पालकमंत्री केसरकर म्हणाले की, या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य शासनाद्वारे पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमी नागरिकांना उपचारासाठी हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रूग्णालय, कूपर रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या घटनेवर लक्ष असून, दुर्घटनाग्रस्तांवर वेळेत उपचार व मदतीसाठी शासन तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले. इमारतींमध्ये अशा प्रकारच्या आगीच्या दुर्घटना घडू नयेत, यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्याची माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. ‘घटनेतील जखमींच्या उपचारासाठीची सर्व मदत करण्यात येत असून, आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत’, असा धीर त्यांनी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिला. या दुर्घटनेबाबत चौकशी करण्यात येणार असून घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल जाईल, असेही त्यांनी सांगितले.

    मुख्यमंत्र्यांनीही घेतली भेट
    गोरेगावमधील जय भवानी एसआरए इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये जखमी झालेल्या नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर येथे जाऊन आस्थेने विचारपूस केली. यावेळी डॉक्टरांकडून त्यांनी या जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची देखील माहिती घेतली. तसेच या सर्वांवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार होत आहेत आहेत अथवा नाही याची माहिती घेऊन त्यांच्यावर लागतील ते सर्व उपचार करावेत त्यांची योग्य वैद्यकीय काळजी घ्यावी असे निर्देश डॉक्टराना दिले.