
भुदरगड/कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटून मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरुळ, सोनुर्ली, ममदापूर आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर प्रकल्पाच्या फुटीची चौकशी करणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. ते आमदार प्रकाश आबिटकर यांनी मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या फुटीची चौकशी करण्याबाबत विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता.
प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे फुटला
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, भुदरगड तालुक्यातील मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्प दि.०१ सप्टेंबर, २०२१ रोजी रात्री १०.३० वाजन्याच्या सुमारास अचानक फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे, नागरीकांच्या घरांचे, जनावरांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये नवले, ता.भुदरगड येथील जिजबाई मोहिते या महिलेचा दुर्देवाने मृत्यु झाला असून पशुधनाची देखील हानी झालेली आहे. हा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे फुटला असून याप्रकल्पाच्या फुटीची चौकशी होण्यासाठी मी वारंवार पत्र व्यवहार केला आहे. अद्याप या प्रल्पाच्या फुटीची चौकशी करण्यात आली नूसन लवकरात-लवकर प्रकल्पाची फुटीची चौकशी करून यामध्ये जे दोषी असतील त्यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
दक्षता पथक व क्वालिटी कंट्रोलची यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी
तसेच जलसपंदा विभागामार्फत कोट्यावधी रुपयांची कामे राज्यात सुरू आहेत. ही कामे शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी अत्यंत महत्वाची आहेत. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असते. या कामांवर चाप बसविणसाठी दक्षता पथक व कॉलीटी कंट्रोलची यंत्रणा काम करत असते. परंतू दर्देवाने दक्षता पथक व कॉलीटी कंट्रोल यंत्रणा निकामी झालेली आहे. अनेक वेळा याबाबत तक्रारी करून देखील यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे दक्षता पथक व क्वालिटी कंट्रोलची यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी देखील आबिटकर यांनी केली.
जे दोषी असतील त्यांचेवर कारवाई करणार
यावेळी उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षता पथक व क्विलिटी कंट्रोलची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कठिबद्ध आहे. तसेच मेघोली प्रकल्पाच्या फुटीची चौकशी करून जे दोषी असतील त्यांचेवर कारवाई करणार असल्याचे अश्वासित केले.