
नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या स्टुडिओचे काय होणार हे सांगण्यापेक्षा आणि दुसऱ्यावर टीका करून बदनामी करण्यापेक्षा स्वतःची पत आणि पद सांभाळावे. नितीन देसाई जाण्यापूर्वी एक महिना मला भेटले होते. नितीन देसाई यांच्या सर्वात जवळचा माणूस मी आहे. त्यामुळे नितीन देसाई यांचे दुःख काय होतं याबाबत मला तोंड उघडायला लावू नका.
रत्नागिरी : नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या स्टुडिओचे काय होणार हे सांगण्यापेक्षा आणि दुसऱ्यावर टीका करून बदनामी करण्यापेक्षा स्वतःची पत आणि पद सांभाळावे. नितीन देसाई जाण्यापूर्वी एक महिना मला भेटले होते. नितीन देसाई यांच्या सर्वात जवळचा माणूस मी आहे. त्यामुळे नितीन देसाई यांचे दुःख काय होतं याबाबत मला तोंड उघडायला लावू नका. जर ते मी बाहेर काढलं तर टीका करणाऱ्या लोकांना रत्नागिरीत तोंड दाखवायला जागा उरणार नाही. पळता भुई थोडी होईल. त्यामुळे त्यांनी आमच्यावर तोंडसुख घेण्यापेक्षा आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे ते पाहावे, असा घणाघाती हल्लाबोल राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला.
रत्नागिरी येथे सावरकर नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी उशिरा आयोजित रत्नागिरी शहर शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री सामंत म्हणाले, आज रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात जमलेल्या या गर्दीने विरोधकांच्या टीकेला उत्तर मिळालेले आहे. शहर कोणाच्या मागे आहे यावर शिक्कामोर्तब झालाय. आपल्या तोडीच्या माणसावर टीका करायची असते. काही लोक रत्नागिरी सोडण्याच्या मनस्थितीत असतील. एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत. बोलणारे आदल्या दिवशी मला मुंबईत भेटतात आणि रत्नागिरीत येऊन छाती पुढे करून बोलतात. रत्नागिरी शहर फक्त आणि फक्त शिवसेनेचं आहे. ज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. न बोलवता आज हजारो लोक आले. तर बोलावून आणले तर काही लोकांची पळता भुई थोडी होईल.
तसेच सगळे शहरातील आहेत. एकही बाहेरचा नाही. ही सगळी ताकद शिवसेनेची आहे. माझ्याविरोधात उमेदवार शोधण्यासाठी काही लोक मातोश्रीवर गेले होते. मात्र, शोधून आले राजापूरचा उमेदवार. लोकशाही आहे. जनताच निर्णय घेणार आहेत. आम्हाला राजकारण कुणी शिकवू नये, असे मंत्री सामंत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मला अक्कल नाही असं कुणी समजू नये. पाचही मतदारसंघात भगवा फडकणार. बाकी सगळे घरी जाणारं. जिल्हा परिषद युतीची येणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. ताकदीचे नगरसेवक आहेत त्यांना शिंदे साहेब नक्की तिकीट देणार. घाबरायची गरज नाही. सगळ्यात अगोदर लोकसभा निवडणूक आहे. तेव्हाच कळेल कुणाची ताकद आहे. मी होतो म्हणून तुम्हाला खासदारकी मिळाली, असे खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता सामंत म्हणाले.