
१० लाख ५२ हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला होता. बिल्डरने रजिस्ट्रेशन सुरु असल्याचे सांगून हा फ्लॅट विकला होता.
कल्याण : घरपण देत नाही, पैसे पण परत केले नाही. म्हणून एका व्यक्तीने कुटुंबासह स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न बिल्डरच्या कार्यालयामध्ये घडली. या प्रकरणी मनसे आमदार राजू पाटील यानी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अशा शंभर तक्रार माझ्याकडे आहे. सर्व सामान्यांची फसवणूक सुरु आहे. यासाठी प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार असल्याची टिका आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
रविवारी मंगेश शेवाळे यांनी कल्याण पूर्वेतील सिद्धी विनायक बिल्डरच्या कार्यालयात कुटुंबासह स्वत:च्या अंगावर रॅकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली शेवाळेसह बिल्डरला चौकशीकरीता ताब्यात घेतले. शेवाळे हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. तुटपुंज्या पगारातून पोटाला चिमटा काढून त्यांनी घर बुक केले. बिल्डरला साडे चार लाख रुपये दिले. १० लाख ५२ हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला होता. बिल्डरने रजिस्ट्रेशन सुरु असल्याचे सांगून हा फ्लॅट विकला होता. त्याचा ताबा मार्च महिन्यात देण्याचे कबूल केले होते. मात्र घराचा ताबा दिला नसल्याने शेवाळे यांनी पैसे परत मागितले. घर दिले जात नाही. पैसे ही परत केले जात नाही. त्यामुळे विफल झालेल्या शेवाळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, ज्या गावात शेवाळे यांना फ्लॅट देण्यात येणार होता. त्या भाल गावात कुठलेही नियोजन नसताना कुठलीही ऑथोरिटी नसताना त्याठिकाणी बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत. कोणी तरी एक परप्रांतीय घ्यायचा. गुजराती घ्यायचा त्यांना जागा सोपवून बांधकामे करायची. परंतू त्याठिकाणी आत्ता रजिस्ट्रेशन होत नाही. अनेक गरीबांनी घरे घेतली आहेत. त्यांची फसवणूक झाली आहे. माझ्याकडे अशा प्रकारच्या १०० तक्रारी प्राप्त आहेत. त्यामुळे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. याला प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार आहेत.