देवेंद्र फडणवीस एक नंबरचे ‘ढ’ असल्याने मोदी आता सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात : सुषमा अंधारे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर राज्यातील ४८ पैकी ४८ खासदार आमचे निवडून येतील. राज्याचे आणि पुण्याचे भाग्य उजळेल, असं भाजप नेते संजय काकडे म्हणाले आहेत. एकीकडे मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर राज्यातील ४८ पैकी ४८ खासदार आमचे निवडून येतील. राज्याचे आणि पुण्याचे भाग्य उजळेल, असं भाजप नेते संजय काकडे म्हणाले आहेत. एकीकडे मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पंतप्रधानांच्या पुण्यातून निवडणूक लढवण्याच्या चर्चेनंतर आता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
    आज संजय काकडे यांनी पंतप्रधांना पत्र लिहून पुण्यातून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे उत्तरप्रदेश मध्ये निवडणूक लढवल्यानंतर त्याठिकाणी ९०% जागांवर भाजपचा विजय झाला होता, त्याचप्रमाणे पुण्यात निवडणूक लढवली तर १०० टक्के जागांवर भाजपचा विजय होईल, असे काकडे यांनी पत्रात म्हटले आहे. यावर आता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर  जोरदार हल्लबोल केला आहे .
    काय म्हणाल्या सुषमा अंधारे? 
    मोदी पुण्यात येत आहेत म्हणजे त्यांना त्यांच्या असलेल्या मतदारसंघातून हरण्याची भीती वाटत आहे. ते आता सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत. आधी मेधा कुलकर्णींवर अन्याय झाला होता. आता कोणावर करतात कुणास ठाऊक. भाजप नेते या निर्णयाचे स्वागत करतात म्हणजे ‘नही स्वागत करेगी तो मरेंगी बुढी’ असे भाजपच्या नेत्यांचं झालं आहे, अशी खोचक टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली.
    देवेंद्र फडणवीस एक नंबरचे ‘ढ’ 
    नरेंद्र मोदी जर पुण्यातून निवडणूक लढवत असतील आणि त्यामुळे जर महाराष्ट्रात भाजपचे 48 खासदार निवडून येणार असतील म्हणजे महाराष्ट्र भाजपची सगळी मदार आता मोदींवर आहे. देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा काहीच नाही. म्हणजेच देवेंद्र फडणवीस एक नंबरचे ‘ढ’ आहेत, असा जोरदार घणाघात सुषमा अंधारेंनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मोदींच नाव चर्चेत आल्यानंतर आपले दंड थोपटले असून त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यावर भाजपच्या संजय काकडे यांनी ‘धंगेकरांनी उभा राहावं त्यांना आमचा विरोध असण्याचे कारण नाही, त्यांना माझ्या शुभेच्छा’ असल्याचं म्हटले आहे.