मुंबईत थंडी वाढली; पारा 15 अंशावर, यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद!

मुंबईत किमान तापमान 15 अंश सेल्सिअसवर गेलं आहे. तर कमाल तापमान देखील 30 अंश सेल्सिअसवर गेलं आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या वातावरणात (Mumbai Weather) सारखा बदल होताना दिसत आहे. रात्री कधी थंडी वाढल्याची जाणीव होत आहे (Cold Weather) तर दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. या वातावरणात मुंबईच्या तापमानाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत (Mumbai) तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

    मुंबईत किमान तापमान 15 अंश सेल्सिअसवर गेलं आहे. तर कमाल तापमान देखील 30 अंश सेल्सिअसवर गेलं आहे. त्यामुळं थंडी अचानक वाढल्याच दिसत आहे. मुंबईत काल किमान तापमान 16 अंश सेल्सिअस होतं. तर आज त्यामध्ये पुन्हा घट झाली आहे. आज पारा 15 अंशावर गेला आहे. दरम्यान, उद्याही मुंबईत गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

    उत्तर भारतातही वाढली थंडी

    महाराष्ट्रासह उत्तर भारतातही थंडीचा कडाका (cold Weather) चांगलाच वाढला आहे. देशाची राजधानी दिल्लीतही थंडीत वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस उत्तर भारतात थंडीचा जोर कायम राहणार आहे. तसेच धुके पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, आज सकाळी पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये अनेक ठिकाणी दाट धुके पडल्याचे पाहायला मिळालं.