‘मला घाबरवण्यासाठी हे सर्व करत असाल तर…’; जितेंद्र आव्हाड यांचं ‘त्या’ प्रकरणावर मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांचे जावई आणि मुलीला शूटर पाठवून ठार करण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांना मारहाण केली होती. त्यावर आता आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केले.

    ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांचे जावई आणि मुलीला शूटर पाठवून ठार करण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांना मारहाण केली होती. त्यावर आता आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केले. ‘ठाणे पोलिसांचा मी लाडका दिसतोय, चित्रपटावेळी माझा संबंध नव्हता. विनयभंगावेळी माझा संबंध नव्हता, आताही माझा संबंध नव्हता. तरीदेखील खोटं काहीही सांगून कार्यकर्ते आणि माझ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मला घाबरवण्यासाठी हे सर्व करत असाल तर मी वाकणार नाही’.

    आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी कन्या नताशा आव्हाड यांच्यासोबत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, ‘पैसे मोजतानाचे व्हिडिओ लोकांनी शेअर केले आहेत. महेश आहेर यांच्या पदवीबाबत अनेकांनी तक्रार केली आहे. तरी देखील कोणतीही कारवाई होत नाही. त्यांचं शिक्षण कमी असताना त्यांना प्रमोशन कसं मिळालं? त्या क्लिपमधील आवाज महेश आहेर यांचा नाही असाच फॉरेन्सिक लॅबचा अहवाल देणार आहे’.

    प्रति स्केअर फुटाने मिळायची लाच

    35 वर्षांच्या राजकारणात एवढे घाणेरडे प्रकार घडले नाहीत. महेश आहेरला प्रति स्केअर फुटानं लाच मिळायची. हा कोणाचा जावई आहे. इतके पुरावे, इतके व्हिडिओ दिले तरी कोणतीच कारवाई होत नाही, असा आरोप यावेळी त्यांनी केला आहे.

    सात जणांवर गुन्हा दाखल

    जितेंद्र आव्हाड यांचे जावई आणि मुलीला शूटर पाठवून ठार करण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यांनंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांना मारहाण केली होती. या प्रकरणी आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    …त्यांच्या परवानगीशिवाय गुन्हे दाखल होऊच शकत नाहीत

    देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात असे कुठे सुडाचे राजकारण झाले नाही. हे मी तेव्हा पण बोलायचो आता पण बोलतोय. पण जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर आताच्या मुख्यमंत्र्यांना विचारले जाते, त्यांच्या परवानगी शिवाय माझ्यावर गुन्हे दाखल होऊच शकत नाहीत, असा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.