काँग्रेसने सत्तेच्या विकेंद्रीकरणाची जोपासना केली आहे. या विचारधारेनुसारच स्वर्गीय विलासकाका व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जातीयवादी विचाराला कधीही स्थान दिले नाही.
मसूर : कराड तालुक्यातील प्रस्थापित मंडळी समाज मानसिक आणि आर्थिक गुलाम बनवण्याचे काम करत आहेत. मात्र, काँग्रेसने सत्तेच्या विकेंद्रीकरणाची जोपासना केली आहे. या विचारधारेनुसारच स्वर्गीय विलासकाका व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जातीयवादी विचाराला कधीही स्थान दिले नाही. काँग्रेसी हीच विचारधारा पुढे नेण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील यांनी केले.
हणबरवाडी (ता.कराड) येथे मसूर नंबर २ विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी जयसिंग पवार यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी इंद्रजित चव्हाण, माजी सभापती एम.जी. थोरात, कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, माजी अध्यक्ष संपतराव इंगवले, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, नंदकुमार जगदाळे उपस्थित होते.
यावेळी इंद्रजीत चव्हाण, निवासराव थोरात, प्रा. धनाजी काटकर, नंदकुमार जगदाळे, अजितराव पाटील चिखलीकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास रंगराव थोरात, सुदाम चव्हाण, आत्माराम जाधव, शैलेश चव्हाण, अमित जाधव, सजन यादव, शहाजी पवार, नामदेव पवार, आबा पवार, विश्वास शेडगे, हरी निगडे आदीसह परिसरातील ग्रामपंचायत, सोसायटीचे पदाधिकारी, भवानी दूध संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
घर भेदीपासून सावध राहा
कराड उत्तर व दक्षिण 9 मध्ये भाजपाचे मतदान किती? हे सर्वांनी समजून घ्यावे. आपणच सरकार मध्ये आंतरजातीय विवाह करून अडचणीत आलो असून घर जाळून पैशाचा व्यापार करण्यापेक्षा राष्ट्रवादीसारख्या घरच्या भेदिपासूनच काँग्रेसने सावध राहावे, असा टोला काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते उत्तम पाटील कोपर्डी हवेलीकर यांनी लगावला.
छोट्या गावांचाही विचार व्हावा
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीनुसार सत्तेच्या विकेंद्रीकरणाची भूमिका काँग्रेस पक्षाने नेहमीच घेतली आहे. यास अनुसरूनच हणबरवाडी सारख्या छोट्याशा गावात मसूर नंबर २ सोसायटीचे अध्यक्षपद देऊन वसंतराव जगदाळे यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे. यापुढेही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला छोट्या छोट्या गावांचा विचार वरिष्ठांकडून व्हावा अशी मागणी अजितराव पाटील चिखलीकर यांनी केली.