मोठा विजय होऊनही भाजप शहराध्यक्ष म्हणाले, ‘विजयाचा आनंदोत्सव नाही’, जाणून घ्या त्यामागचं कारण काय?

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप (Ashwnini Jagtap) यांना मिळालेला विजय हा दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांना समर्पित करीत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे (Mahaesh Landge) यांनी दिली.

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप (Ashwnini Jagtap) यांना मिळालेला विजय हा दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांना समर्पित करीत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे (Mahaesh Landge) यांनी दिली.

चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. या निवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप बहुमताने निवडून आल्या आहेत. त्यावर महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडकरांनी विकासाच्या मुद्दांवर मतदान केले. दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी शहराच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्याचे स्मरण इथल्या भूमिपुत्रांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी ठेवले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत स्वत: लक्ष घातले होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर विश्वास ठेवून सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यानंतरसुद्धा अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजप-शिवसेना महायुतीवर विश्वास दाखवला. त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. या निवडणुकीत रात्रं-दिवस मेहनत घेणारे महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या एकत्रित लढ्याचा हा विजय आहे. शहराच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा विजय आम्ही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो, असे म्हटले.

आनंदोत्सव नाही…

पोटनिवडणूक दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागली आहे. जगताप यांच्या निधनामुळे शहराची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील विजयाबाबत शहर भाजप पिंपरी-चिंचवडमध्ये आनंदोत्सव साजरा करणार नाही. आम्ही जगताप यांच्या स्मृतीस्थळी भेट देणार असून, त्यांना अभिवादन करणार आहोत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. त्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला नाही. निवडणुका येतील आणि जातील. पण, एखाद्या व्यक्तीने आयुष्यातील ३० वर्षे शहराची सेवा केल्यानंतर त्यांच्या निधनाने आपण संवेदनशीलता दाखवत नसेल, तर भावी पिढी आपल्याकडून काय आदर्श घेईल? अशी खंतही आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.