कांदा, वांगी, ढोबळी मिरचीच्या दरात घट, मागणी वाढल्यामुळे पालेभाज्यांचा भाव वाढला

घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, वांग्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

    पुणे : घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, वांग्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (५ नोव्हेंबर) राज्य, तसेच परराज्यांतून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती.

    गुजरात, कर्नाटकमधून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून ३ टेम्पो शेवगा, कर्नाटकातील बेळगावमधून ४ टेम्पो घेवडा, इंदूरमधून २ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ४५ ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

    मागणी वाढल्याने कोथिंबीर, मुळा, चाकवत, शेपू, पालक या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या दीड लाख जुडी, मेथीच्या ८० हजार जुडींची आवक झाल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.