शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत मग नवीन गाड्या घ्यायला पैसे कुठून येतात?; राजू शेट्टींचा सवाल

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांसह आजपासून (दि.1) प्रयाग चिखली ते नृहसिंहवाडी अशी पंचगंगा परिक्रमा आक्रोेश पूरग्रस्तांचा पदयात्रा सुरूवात करण्यात आली.

    कोल्हापूर : पूरबाधित शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची मदत जाहीर करा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांसह आजपासून (दि.1) प्रयाग चिखली ते नृहसिंहवाडी अशी पंचगंगा परिक्रमा आक्रोेश पूरग्रस्तांचा पदयात्रा सुरूवात करण्यात आली. सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, मंत्र्यांची दालने सजवायला, नवीन गाड्या घ्यायला, साखर कारखान्यांना बँक हमी द्यायला कुठून पैसे येतात?,’ असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

    पूरग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चिखली येथून पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकार विरोधात जोरदार टीका केली. सरकार नुसत्या घोषणा करतय पण आता आमचा घोषणाच्यावर विश्वास राहीलेला नाही. महापुरामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. त्याला आता सरकारच्या मदतीची गरज आहे. सव्वा महिना उलटून गेला तरी अजूनही मदत मिळाली नाही. उलट आम्हालाच संयम बाळगा अशी विनंती मंत्री करत आहेत. आंदोलन करण्याची हौस नाही, आमच्या मागण्या तातडीने मान्य करा आणि शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

    प्रयाग चिखली येथून सुरूवात केली असून पाच दिवस चालणाऱ्या या परिक्रमामध्ये मी वाहनाला स्पर्शही करणार नाही. माझ्याबरोबर सर्वांनी पाच दिवस पंचगंगा नदीच्या काठावरून चालत जायचे आहे. पाच दिवसात सरकारने ठोस निर्णय जाहीर केला नाही तर पाच सप्टेंबर रोजी हजारो कार्यकर्ते पंचगंगा नदीत बुडून जीव देतील,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

    आमच्या मागण्या मान्य न झाल्यास रविवारी (दि.५) रोजी नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत हजारो शेतकर्‍यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. यावेळी राजू शेट्टी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

    पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी २३ ऑगस्टला राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. मोर्चानंतर ‘आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची’ ही पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्‍यांनी जाहीर केले होते.
    त्यानुसार प्रयाग चिखली येथील दत्त मंदिरातून सकाळी आठ वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. ५ सप्टेंबर रोजी नृसिंहवाडी येथे या पदयात्रेची सांगता होणार आहे. यामध्ये हजारे पूरग्रस्त शेतकरी सहभागी होणार आहेत.

    यावेळी सावकार मादनाईक, डॉ. जालंदर पाटील, वैभव कांबळे, अजित पवार, बाळासाहेब पाटील, रंगराव पाटील, राजाराम देसाई, सागर शंभुशेटे, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ राजू शेट्टी, सम्मेद शिखरे, सचिन शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.

    पूरग्रस्तांच्या मागण्या

    2019 च्या धर्तीवर शेतकर्‍यांना मदत द्या
    विनाअट संपूर्ण कर्जमाफी करा
    नुकसानग्रस्त प्रत्येक घटकाला तत्काळ आर्थिक मदत द्या
    पडझड झालेली घरे बांधून द्या

    पूरबाधित क्षेत्रातील रहिवाशांचे जवळच पुनर्वसन करा
    कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुला जवळचा भराव कमी करून तातडीने कमानी पूल बांधा
    पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा

    अशी आहे पदयात्रा…

    •१ सप्टेंबर : सकाळी 8 वाजता प्रयाग चिखली येथून पदयात्रेचा प्रारंभ. शिये येथे मुक्काम
    •२ सप्टेंबर : सकाळी 8 वाजता शिये येथून प्रारंभ. चोकाक येथे मुक्काम.
    • 3 सप्टेंबर : सकाळी 8 वाजता चोकाक येथून प्रारंभ. पट्टणकोडोलीत मुक्काम
    •४ सप्टेंबर : सकाळी 8 वाजता पट्टणकोडोली येथून प्रारंभ. अब्दुललाट येथे मुक्काम
    • ५ सप्टेंबर : सकाळी 8 वाजता अब्दुललाट येथून प्रारंभ. नृसिंहवाडी येथे पदयात्रेची सांगता.