अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने ३ जानेवारीला होणार बैठक

साहित्य महामंडळाकडे आगामी संमेलनासाठी नाशिक, अंमळनेर आणि पुण्यातील सरहद संस्थेचे दिल्लीकरिता अशा तीन ठिकाणांहून संमेलनासाठी निमंत्रणे आली आहेत. वर्धा येथून निमंत्रण येण्याची शक्यता आहे. सरहदने महामंडळाला प्रस्ताव पाठवून आगामी संमेलन दिल्लीत घेण्याची विनंती केली आहे.

पुणे : आगामी वर्षातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने साहित्य महामंडळाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. साहित्य महामंडळाने सर्व घटक, संलग्न व समाविष्ट संस्थांची येत्या ३ जानेवारीला औरंगाबाद येथे बैठक बोलावली आहे. सर्व सदस्यांनी संमेलन आयोजनासाठी होकार दर्शविल्यानंतर स्थळ निवड समिती, संमेलन नियोजन समितीची नियुक्ती करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. बदललेल्या परिस्थितीत आयोजनाची तयारी कशी असेल, यावर निर्णय ठरेल.

साहित्य महामंडळाकडे आगामी संमेलनासाठी नाशिक, अंमळनेर आणि पुण्यातील सरहद संस्थेचे दिल्लीकरिता अशा तीन ठिकाणांहून संमेलनासाठी निमंत्रणे आली आहेत. वर्धा येथून निमंत्रण येण्याची शक्यता आहे. सरहदने महामंडळाला प्रस्ताव पाठवून आगामी संमेलन दिल्लीत घेण्याची विनंती केली आहे. मात्र महामंडळाने अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. करोनामुळे हे वर्ष आर्थिक संकटातून जात असताना संमेलनासाठी निमंत्रण देणार्‍या संस्था आयोजनाबाबत पुर्नविचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संमेलनासंदर्भातील बैठकीसाठी सदस्यांना पत्र पाठविण्यात आली आहेत. संस्था आयोजनाला तयार आहेत का? संमेलन कशा पद्धतीने करायचे? निधी उपलब्ध होईल का? असे सगळे प्रश्न आहेत. संमेलनाच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा विचार केला जाईल-
-प्रा. कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष साहित्य महामंडळ