संस्कृती कपड्याने बदलत नाही तर मनी भाव असला पाहिजे : खासदार श्रीनिवास पाटील

पिंपरी : परदेशी फ्लेमिंगो पहायला गर्दी करणा-या आजच्या पिढीला चिमण्या, कावळ्यांची आणि येथील काळ्या मातीची महती कळली पाहिजे. यासाठी आजच्या पिढीने मराठी साहित्याचे वाचन करायला पाहिजे. आधुनिकते बरोबरच संस्कृतीतही बदल होत गेला. पाश्चात्यांप्रमाणे तोकडे कपडे घालून पांडूरंगाचा गजर करणारी युवा पिढी आपण पहात आहोत. संस्कृती कपड्याने बदलत नाही तर मनी भाव असला पाहिजे. कपड्यांपेक्षा, भाषेपेक्षा भाव महत्वाचा आहे. असा भाव भक्तीचा भूकेला संवेदनशील कवी मनाचा, कामगार नेता अरुण बो-हाडे यांनी लिहिलेली ‘माय माझी इंद्रायणी’ आणि ‘ वेध सामाजिक जाणिवाचा’ पुस्तके म्हणजे एक अनमोल ठेवा आहे , असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

‘माय माझी इंद्रायणी’ आणि ‘ वेध सामाजिक जाणिवाचा’ या अरुण बो-हाडे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

पिंपरी : परदेशी फ्लेमिंगो पहायला गर्दी करणा-या आजच्या पिढीला चिमण्या, कावळ्यांची आणि येथील काळ्या मातीची महती कळली पाहिजे. यासाठी आजच्या पिढीने मराठी साहित्याचे वाचन करायला पाहिजे. आधुनिकते बरोबरच संस्कृतीतही बदल होत गेला. पाश्चात्यांप्रमाणे तोकडे कपडे घालून पांडूरंगाचा गजर करणारी युवा पिढी आपण पहात आहोत. संस्कृती कपड्याने बदलत नाही तर मनी भाव असला पाहिजे. कपड्यांपेक्षा, भाषेपेक्षा भाव महत्वाचा आहे. असा भाव भक्तीचा भूकेला संवेदनशील कवी मनाचा, कामगार नेता अरुण बो-हाडे यांनी लिहिलेली ‘माय माझी इंद्रायणी’ आणि ‘ वेध सामाजिक जाणिवाचा’ पुस्तके म्हणजे एक अनमोल ठेवा आहे , असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

रविवारी (दि. २७ डिसेंबर) मोशी येथे अरुण बो-हाडे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानावरुन खा. पाटील बोलत होते. व्यासपीठावर आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी शहर कॉंग्रेस अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी उपमहापौर शरद बो-हाडे, महंमद पानसरे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अरुण बो-हाडे तसेच गीतांजली बो-हाडे, हिरामण सस्ते, ज्ञानेश्वर सस्ते, प्रकाशक संदिप तापकीर आणि योगेश काळजे, हभप तुकाराम भालेकर, श्रीहरी तापकीर, श्रीधर वाल्हेकर, कामगार नेते दिलीप पवार, आतिश बारणे, सुहास पोफळे, विजय भिसे आदी उपस्थित होते.

खा. पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहराचा गाव ते स्मार्ट सिटी प्रवास सांगितला. ‘रगेल आणि रंगेल’ स्वभावाची जीवाभावाची माणसं असणारा तालुका हवेली. या तालुक्यातील भोसरी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी ही समृध्द आणि स्वता:चं स्वतंत्र महात्म्य असणारी गावं. या गावांचे आण्णासाहेब मगर यांनी शहरात रुपांतर केले. दुरदृष्टी असणा-या यशवंतराव चव्हाण यांच्या सारख्या न. वि. गाडगीळ यांनी एचए कंपनी येथे आणली. कालांतराने शहराचा विस्तार झाला. देशभरातील कोणत्याही व्यक्तीला येथे पोट भरण्यापुरता रोजगार मिळतोच अशी पिंपरी चिंचवड शहराची ख्याती आहे. या मातीशी इमान राखणारे, मातीतच आपलं जीवन संपवणारे जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज आणि त्या मातीतच संजवनी समाधी घेणा-या ज्ञानेश्वर माऊलींची ही पवित्र भूमी. छत्रपती शाहू महाराज, पठ्ठे बापूराव, बालगंधर्व, रामचंद्र प्रभूणे, दुरदृष्टीचे नेते यशवंतराव चव्हाण अशी प्रतिभा संपन्न थोर व्यक्तीमत्व या महाराष्ट्रातील मातीत जन्मली अशी माहिती खा. पाटील यांनी दिली.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, आजची संस्कृती, राजकारण जातीबध्द झाले आहे. पण भारतीय संविधानाला जात धर्म नाही. भारतात राजकारण करणारे भरपूर आहेत. पण यशवंतरावांसारखे सुसंस्कृत कमी आहेत. यशवंतराव चव्हाण हे अस्सल माणूसपण जपणारे होते. त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेले शरद पवार, श्रीनिवास पाटील हे माणूसकीचं राजकारण करणारे नेते आहेत. नेता ही संकल्पना बदनामीच्या चक्रात अडकली आहे. राजकीय नेतृत्वाने आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. लोकशाहीचे चाललेले विडंबन समाधानकारक नाही. कामगारांचे शोषण करणारे कामगार नेते वाढत असताना साने गुरुजी आणि रविंद्रनाथ टागोर यांना आदर्श मानून लेखन करणारा संवेदनशील लेखक, कवी, पत्रकार आणि राजकारणाच्या भिंती ओलांडून काम करणारा कामगार नेता अरुण बो-हाडे आपले वेगळेपण अधोरेखित करतो असे डॉ. सबनीस म्हणाले.

सध्याच्या राजकीय वर्तुळात संवाद संपला आहे, अशी अनुभूती येणे म्हणजे ही खरीखुरी लोकशाही नाही. शेतकरी आंदोलनाबाबत राजकारण करणा-यांना लाजा वाटल्या पाहिजे. बळीराजा उपाशी असताना कसले राजकारण करता. शेतकरी हातात बंदूका घ्यायच्या आधी जागे व्हा असा इशारा डॉ. सबनीस यांनी दिला. याला राजकारणापेक्षा लबाड विव्दान अधिक कारणीभूत आहेत. समाजात झालेल्या अधपतनाला लाखोंचा पगार घेणारे शिक्षक, प्राध्यापक ही जबाबदार आहेत. काही प्रामाणिकपण आहेत. विद्येची आणि संस्कृतीची केंद्र आता पुण्या, मुंबईत नाही तर गावाच्या मातीत आहेत. हे अरुण बो-हाडे सारख्यांनी दाखवून दिले आहे असेही डॉ. सबनीस म्हणाले.

प्रास्ताविक करताना अरुण बो-हाडे म्हणाले की, या पुस्तकात सामाजिक जडणघडण, सामाजिक मनोभाव आणि सामाजिक स्पंदने आणि जाणिवा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रमाच्या संयोजनात राम सासवडे, दामोदर वहिले, सनिल सत्ते, गणेश सत्ते, ज्ञानेश्वर वायकर, विजय पिरंगुटे आदींनी सहभाग घेतला. प्रास्ताविक अरुण बो-हाडे, सुत्रसंचालन संतोष घुले आणि आभार हिरामण सस्ते यांनी मानले.