“फौजदाराचा हवालदार झाला” या वाक्यामुळे जयंत पाटील ईडीच्या रडारवर – इम्रान शेख  

जयंत पाटील यांना ईडी नोटीस पाठवल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

    पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ‘फौजदाराचा हवालदार झाला’ हे वाक्य जिव्हारी लागल्यामुळे त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू करण्यात आली. भाजप नेत्यांनी राजकीय सूडबुद्धीने ईडीची पीडा मागे लावून जयंत पाटील यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याला त्रास देऊन नाहक बदनाम करण्याचा प्रकार चालवला असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केला.
    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठविल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसतर्फे शहरात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शेख बोलत होते.
    पुढे बोलताना इम्रान शेख म्हणाले, “जयंत पाटील हे उच्चविद्याविभूषित,चारित्र्यसंपन्न आणि निष्कलंक नेते आहेत. त्यांचे 40 वर्षांचे सार्वजनिक व राजकीय जीवन हे एक खुले पुस्तक आहे. मात्र सध्या त्यांच्यावर राजकीय आकसाने ईडी कारवाई केली जात असल्याच्या संतप्त भावना यावेळी व्यक्त केली. या 9 वर्षात भाजपच्या एकाही आमदार खासदारांना ईडीची नोटीस आल्याची एकपण बातमी नाही. परंतु महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना जाणून-मधून सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून त्रास देण्याचे काम हे फॅसिस्ट सरकार करत असल्याचा आरोप देखील त्यांनी लावला. “भाजपच्या या लोकशाही विरोधी कारभारास जनता मतदानातून योग्य उत्तर देईल. आज आम्ही रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करत आहोत यापुढे हे प्रकार थांबले नाहीत तर भाजपच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येतील”, असा सज्जड इशाराही इम्रान शेख यांनी दिला.
    यावेळी “भाजपा वॉशिंग मशीन आणि ईडी वॉशिंग पावडर” याचं प्रात्यक्षिक सादर करून भाजपकडून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडीचा कशाप्रकारे वापर केला जातो, हे दाखवण्यात आले. आंदोलनाप्रसंगी देवेंद्र तायडे, राजन नायर, तानाजी खाडे, युवराज पवार, मीरा कदम, राजेंद्रसिंग वालिया आदी पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.
    याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे “ईडी भाजपचा घरगडी” “भाजप हमसे डरती है ईडी को आगे करती है” “भाजपचा हवालदार काय करतो ईडीच्या नोटीस वाटत फिरतो” “ईडी सरकार हाय हाय” अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
    या आंदोलनात प्रदीप गायकवाड,राहुल पवार, ओम क्षिरसागर,राजू खंडागळे, विकास कांबळे, संजय औसरमल, प्रकाश सोमवंशी, सतीश दरेकर, कविता खराडे, मनिषा गटकळ, निकिता कदम, पीयूष अंकुश, सनी वाघमारे, सारीका पवार, रामभाऊ आव्हाड, केतन होके, विकास वाघमारे, श्रीधर वाल्हेकर, निखिल घाडगे, सागर वाघमारे, तुषार ताम्हाणे, संकेत जगताप, पूनम वाघ, मीरा कदम, संगीता कोकणे, इरफान शेख, बाळासाहेब पिल्लेवार, अकबर  मुल्ला, सुदाम शिंदे, अभिजित आल्हाट, राजेश हरगुडे, सचिन वाल्हेकर, आकाश शिंदे, मयूर खरात, अजय पवार, दिनेश गंगावणे, शाहीद शेख, अनुज देशमुख, संकेत उबाळे आदींसह  युवक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.