
कोरोना संकटामुळे अनेकांचे ववर्क फ्रॉम होम सुरू आहे. तसेच सर्व शिक्षणही ऑनलाईन सुरू आहे. त्यासाठी परिसरातील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पिंपरी: शाहूनगर – संभाजीनगर परिसरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. वीज महावितरण कंपनीकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तिव्र असंतोष पसरला आहे. शिवसेना पिंपरी विधानसभा शहर उपप्रमुख पांडुरंग पाटील यांनी याबाबत वीज महावितरणचे आकुर्डी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.
महावितरणच्या आकुर्डी उपविभागात मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाही. गेल्या काही दिवसांपासून शाहुनगर – संभाजीनगर परिसरातील वीजपुरवठा सतत खंडीत होत आहे. त्याचबरोबर कधी वीजेचा दाबही कमी-जास्त होणे, मोठ्या आवाजाचे स्फोट होणे असे प्रकार सुरू आहेत. यामुळे घरातील इलेक्ट्रीकल उपकरणे मोठ्या प्रमाणात खराब झाली आहेत. शाहुनगर – संभाजीनगर परिसरात गेल्या १५ वर्षात नवीन मोठी बांधकामे झाली नाहीत. नवीन वीजजोड देण्यात आलेली नाहीत. असे असताना वीजपुरवठाखंडित होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
नागरिकांनी अनेकदा फोनद्वारे तसेच लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून तक्रारी केल्या आहेत. सोशल मिडीयाद्वारेही केलेल्या तक्रारी निदर्शनास आल्या आहेत. सध्या कोरोना संकटामुळे अनेकांचे ववर्क फ्रॉम होम सुरू आहे. तसेच सर्व शिक्षणही ऑनलाईन सुरू आहे. त्यासाठी परिसरातील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.