आनेवाडी टोल नाक्यावर राडा; मुंबईच्या वाहनचालकाला मारहाण

पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर (Aanewadi Tollnaka) फास्टॅग स्कॅन न झाल्याच्या कारणावरून मुंबईतील नालासोपारा येथील वाहनचालकास कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित चालकाने भुईंज पोलिस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

    सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर (Aanewadi Tollnaka) फास्टॅग स्कॅन न झाल्याच्या कारणावरून मुंबईतील नालासोपारा येथील वाहनचालकास कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित चालकाने भुईंज पोलिस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

    मयुरेश भाऊसाहेब शेलार (वय २८. रा. नालासोपारा) हे गुरूवारी रात्री सातारा बाजूकडे येत होते. सातारा येथील आनेवाडी टोलनाका मयुरेश शेलार आले आले असता त्यांनी फास्टॅग लाईनमधून कार नेली. परंतु, तांत्रिक कारणामुळे फास्टॅग स्कॅन झाला नाही. यावरून कर्मचारी व शेलार यांच्यात वाद झाला. याचे पर्यावसन मारहाणीत झाले. वादावादीनंतर टोलनाक्यावरील 10 जणांनी वाहनातील पाच जणांना मारहाण केली.

    टोलनाक्यावरील किरण बाबूराव सोनवणे, सचिन अशोक जाधव यांच्यासह 10 जणांनी शेलार यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याचदरम्यान शेलार यांच्यासोबत आलेल्या निमिष नरेंद्र चव्हाण, प्रथमेश चंद्रकांत घोसाळकर, विठ्ठल भागोजी धुमाळे, दुर्वेश नारायण गिरासे यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.