टेंभूर्णी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मागील 2020 /2021 गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रति टन 176 रुपयेप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सध्या जमा करण्यात आले असून, एफआरपीप्रमाणे 2376 रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना पोहोचले आहेत. एफआरपीप्रमाणे संपूर्ण रक्कम शेतकऱ्याना देणारा विठ्ठलराव शिंदे युनिट 1 व युनिट 2 जिल्ह्यात अव्वल ठरले आहेत. दरम्यान 2021/2022 हा पुढील गळीत हंगाम रविवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी साध्या पद्धतीने उसमोळी व गव्हाण पूजन करून साजरा होणार आहे.
विठ्ठलराव शिंदे 1 चे सकाळी दहा वाजता तर करकंब येथील 2 चे सायंकाळी चार वाजता पूजन होणार आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे 15 ऑक्टोबरपासून दोन्ही युनिटचे रितसर गाळप सुरू होणार आहे. याचबरोबर विठ्ठलराव शिंदे युनिट1 व 2 च्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त पंधरा दिवसाचा पगार व 33.8 टक्के बोनस देणार असल्याचेही या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अधिक माहिती देताना आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, चालू गळीत हंगामात विठ्ठलराव शिंदे युनिट 1 पिंपळनेर यामधून 20 लाख मेट्रिक टन गाळप करण्याचा उद्देश असून करकंब येथील युनिट 2 मध्ये पाच लाख मेट्रिक टन असे एकूण 25 लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट आहे. तसेच विठ्ठलराव शिंदे युनिटी 1 व 2 मधून एकूण तेरा कोटी युनिट वीज निर्मिती तर दोन्ही युनिट मधून चार कोटी 50 लाख लिटर इथेनॉल निर्मिती करण्याचा उद्देश आहे.
मागील 20/21 हंगामात दोन्ही युनिटमधून 18 लाख 75 हजार 382 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते व आज एफआरपीप्रमाणे याचे संपूर्ण बिल अदा केले आहे, एकूण 448 कोटी 14 लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले असल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले.
साखर वाटप
प्रतिवर्षीप्रमाणे कारखान्याचे सभासद व ऊस पुरवठादार यांना दिवाळीनिमित्त 50 किलो साखरेची गोणी घरपोच देण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे. ज्यांचा उस गळीतास आलेला आहे त्यांना उधारीत व ऊस नसेल त्यांना चौदाशे पन्नास रुपये प्रति 50 किलो याप्रमाणे साखर देण्यात येत आहे.
ऊस तोडणी युनिट एक व दोन ऊस तोडणी वाहतुकीसाठी सर्व ऍडव्हान्स पेमेंट दिले गेले आहे., तसेच वाढीव डिझेल दराचा फरक देण्याचा संचालकांचा मानस आहे.
कारखान्याचे वजन काट्याविषयी आमदार शिंदे म्हणाले की, शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर वारंवार या कारखान्याचे उसाचे वजन काटे तपासण्यात आले आहेत तसेच भरारी पथकाच्या मार्फत वजन काट्याची तपासणी करण्यात आलेली असून कोणत्याही प्रकारचा दोष आढळलेला नसून वजन काटे योग्य असल्याचा अभिप्राय दिलेला आहे. त्यामुळे कोणीही फुकट बदनामी करू नये किंवा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
ऊस विकास योजनेअंतर्गत कारखाना शेतकऱ्यांना पाचशे रुपये प्रति टनप्रमाणे कंपोस्ट खत शेतात नेऊन पोहोच करत आहे, तसेच ठिबक सिंचन, मातीपरीक्षण यासाठीही वेळोवेळी सहकार्य केले जात आहे. ऊस विकास तज्ञ कृशिभूषण संजीव माने व सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रामधील 84 शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये ऊस उत्पादनावर नवीन प्रयोग करण्यात येत असून, जास्तीत जास्त टनेज वाढावे व रिकव्हरी पण चांगली मिळावी. यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. को 860 32, को 10001, को 8005 या उसाच्या जातीच्या साठी कारखाना कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहकार्य करत आहे.
याशिवाय शेतकऱ्यांना चिकू, आंबा, नारळ आदी फळांच्या रोपांचे वाटप केले जाते. तसेच रक्तदान शिबिर,कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनसिलिंडर देणगी इत्यादी सामाजिक उपक्रमाबाबत कारखाना सदैव तत्पर असतो असेआ. दादांनी आवर्जून नमूद केले.
पुढील हंगामासाठी एफआरपीप्रमाणे दर देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत व इतर सर्व कारखान्यांच्या पेक्षा अधिक चांगल्या प्रकारचे ऊसाचे पहिले बिल आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना निश्चित दिली जाईल असेही दादांनी आवर्जून सांगितले.
या पत्रकार परिषदेसाठी जनरल मॅनेजर सुहास यादव ,कारखान्याचे कार्यकारी संचालक डिग्रजे मुख्य शेतकी अधिकारी संभाजी थिटे तसेच इतर सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.