
नेरूळ सेक्टर 6 सारसोळे येथे 15 मार्चला अपना बाजार मार्केटच्या समोरच्या रोडवर सायंकाळी बांधकाम व्यावसायिक सवजीभाई मंजेरी (वय 56) या बांधकाम व्यावसायिकाची दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली.
नवी मुंबई: आजकाल सगळीकडे खून, चोरी, अपहरण या घटनांचं प्रमाण वाढत आहे. नवी मुंबईत नुकतीच एका बांधकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. या खून प्रकरणातील (Murder) तीन आरोपींना पकडण्यात नवी मुंबई (Navi Mumbai) पोलिसांना यश आलं आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येसाठी पंचवीस लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. ही हत्या जमिनीच्या वादातून झाली असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) दिली आहे.
भरदिवसा हत्या
नेरूळ सेक्टर 6, सारसोळे येथे 15 मार्चला अपना बाजार मार्केटच्या समोरच्या रोडवर सायंकाळी बांधकाम व्यावसायिक सवजीभाई गोकर मंजेरी (वय 56) या बांधकाम व्यावसायिकाची दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. मोटार सायकलवर येवून भर रस्त्यात त्यांनी गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले. या संदर्भात नेरुळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके तयार करुन या प्रकरणी तसाप सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
तीन आरोपींना अटक
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलचा शोध घेतला. तेव्हा त्यांना मेहेक जयरामभाई नारीया ( वय 28) राजकोट गुजरात येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपीला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल यादव (वय 18), गौरव कुमार यादव (वय 24) आणि सोनू कुमार यादव (वय 23) या तीन आरोपींना अटक केली आहे.
जमिनीच्या वादातून हत्या, 25 लाख रुपयांची सुपारी
अटक केलेला आरोपी मेहेक जयरामभाई नारीयायाने दिलेल्या माहितीनुसार, बचूभाई धना पटणी या व्यक्तीचा मृत सवजीभाई गोकर मंजेरी याने 1998 साली मुळ गावी गुजरात येथे खून केला होता. तसेच नोव्हेंबर 2022 मध्ये आरोपी व त्याच्या नातेवाईकांनी गुजरात राजकोट येथील साई या मुळ गावी काही माणसांना पाठवून भरचौकात मारहाण केली होती. मंजेरी सीबीडी-बेलापूर निवासस्थानी जाण्यासाठी 15 मार्च रोजी त्यांच्या कारमध्ये बसले. तेव्हा दुचाकीवरील दोन पुरुष त्याच्या एसयूव्ही गाडीजवळ थांबले आणि सावजीवर तीन गोळ्या झाडल्या. वैयक्तिक वैमनस्य आणि जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. बिहार राज्यातील मारेकऱ्यांना बोलवून या हत्येची 25 लाख रुपयांची सुपारी दिली होती.