राजापूर-पांगरे बुद्रूक इथे आढळली एलिफंटा केव्ह पुर्वीची पुरातन शैव लेणी आणि चार शिवमंदिरे, राजापूर मानवी इतिहासाचे केंद्रबिंदू ठरणार?

लेणींमधील चारपैकी तीन गर्भगृहांमध्ये अधिष्ठानावर शिवलिंग असून, ते शिस्ट किंवा ग्रॅनाइट प्रकारच्या दगडापासून बनविले आहे.

    राजापूर : बारसुच्या जागेवर सापडलेले इसवी सनपुर्व चार संस्कृतीचाही उगम सांगणारे अश्मयुगीन कातळशिल्प मानवी इतिहासाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता असताना व त्यादृष्टीने त्याचा अभ्यास सुरु असताना आता राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रूक येथे पुरातन शैव लेणी सापडल्याने संपुर्ण जगातील इतिहास संशोधकांचे लक्ष राजापूरकडे वळले आहे. पांगरे बुद्रुक येथील ही पुरातन शैव लेणी मानवी इतिहासाच्या अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणार आहेत.

    पुरातत्त्वीय वारशाची खाण म्हणता येईल अशा वारशाच्या पाऊलखुणा कोकणपट्ट्यात पाहायला मिळतात. कोकणातले राजापूर (जि. रत्नागिरी) हे गरम पाण्याचे झरे आणि गंगा अवतरणासाठी प्रसिद्ध आहे, तर बारसुच्या सड्यावर सापडलेले कातळशिल्प युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या प्राथमिक यादीत समाविष्ट झालेले आहे. याच राजापूर तालुक्यातील पांगारे बुद्रुक या गावी पाचव्या-सहाव्या शतकातील शैव लेणींचा शोध लागला आहे. २०१६ मध्ये केलेल्या पुरातत्त्विक सर्वेक्षणात पुरातत्त्वज्ञ आणि इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. अंजय धनावडे यांना या लेणी आढळून आल्या. धनावडे यांनी पुरातत्त्व अभ्यासक आणि अर्क्टिटेक्ट सलील सय्यद आणि अदिती महाजन यांच्यासोबत या लेणीचा सर्वांगीण अभ्यास केला असून, या संशोधनानुसार या लेणीचा कालखंड पाचवे-सहावे शतक किंवा त्या आधीचा अर्थात मुंबई येथील घारापुरी लेणींच्या आधीचाही (एलिफंटा केव्ह) असू शकतो, असा दावाही केला आहे.

    राजापूर तालुक्यातील ‘पांगरे बुद्रुक गावातील जांभ्या दगडाच्या टेकडीत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा दोन कातळात खोदलेल्या लेण्या आणि दोन एकाच दगडात खोदलेली चार शिवमंदिरे आढळून आली आहेत. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील शैव सप्रदायशी ही लेणी संबंधित आहेत. हा मंदिर आणि लेणीसमूह प्रारंभिक शैव संप्रदायापैकी एक आहे. त्याची स्थापत्यशैली आणि पुरातत्त्व वैशिष्ट्यांवरून हा लेणीसमूह घारापुरी म्हणजे एलिफंटा लेणीच्याही आधीच्या कालखंडातील आहे. यातील दोन लेणींचे स्वरूप लेणीसमोर मोकळे प्रांगण नंतर मंडप आणि पाठीमागे गर्भगृह असा तलविन्यास आहे, तर दोन मंदिरे स्वतंत्र अशा अखंड दगडात कोरलेली आहेत.

    सद्यस्थितीत या लेण्यांच्या बाजुला शासनाने एका पाझर तलावाची निर्मिती केली असुन या पाझर तलावाच्या निर्मितीवेळीच येथील नागरिकांना या लेण्यांचा शोध लागला होता. मात्र प्रथेप्रमाणे ही पांडवकालीन लेणी असावीत असा कयास स्थानिक लोक व्यक्त करत होते. त्यावेळी काही स्थानिक वृत्तपत्रानी या लेण्याना प्रसिद्धी दिली होती मात्र त्याचा अभ्यास झाला नव्हता.

    ही पुरातन शैव लेणी पांगरे गावातील एका डोंगर उतारावर असुन याच डोंगराच्या पायथ्याशी टेंबेस्वामी मठ आहे. त्या मठाचा इतिहासही व्यापारांशी निगडीत असल्याचे मानले जाते. टेंबेस्वामींच्या कथासारात याचा उल्लेख आढळुन येतो. या टेंबेस्वामी मठाच्या खालच्या बाजुला ओढ्याकिणारी एक पुरातन शिवमंदिर आहे. अनेक भाविक या टेंबेस्वामी मठाला व तेथील पुरातन शिवमंदिराला भेट देतात मात्र आता सापडलेली पुरातन शैव लेणी ही डोंगरात घनदाट जंगलात असल्याने ती आजपर्यंत दुर्लक्षित राहीली होती.

    त्यानंतर करोना महामारीच्यापुर्वी या लेणींचा अभ्यास प्रा. डॉ. अंजय धनावडे आणि सहकाऱ्यांनी सुरू केला होता. मात्र, अत्यंत दाट झाडी आणि येथील जंगलामुळे त्यांचे स्वरूप समजणे अवघड होते. करोनाकाळात संचारबंदीमुळे येथे भेट देणे शक्य न झाल्याने हा अभ्यास दुर्लक्षित राहिला. या अप्रकाशित लेणींची नोंद अद्याप घेतली गेली नव्हती. मात्र भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे (एएसआय) २०१८ मध्ये या लेणींची नोंद करण्यात आली, अशी माहिती डॉ. धनावडे यांनी बोलताना दिली.

    ‘एका मोठ्या मंदिराच्या शिखराचा भाग हा प्राचीन स्थापत्यामध्ये आढळून येणाऱ्या ‘गजपृष्ठकार’ आहे, तर त्याहून लहान असलेल्या मंदिराचे शिखर हे चक्क कोकणात आढळून येणाऱ्या उतरत्या छपराप्रमाणे असून, या दोन्ही लेण्यांमध्ये गर्भगृहातील अधिष्ठानावर शिवलिंग प्रस्थापित केले गेले आहे. मंदिरातील गर्भगृहाला लाकडी दरवाजा बसविला जात असावा, तसेच चारही मंदिरांच्या मंडपासमोर तात्पुरत्या स्वरूपाचा लाकडी मांडव उभारत असावेत, असे त्याच्या दर्शनी भागात केलेल्या खाचांवरून लक्षात येते. या लेण्यांचा अभ्यास आणि सर्वेक्षणासाठी आम्हाला ओंकार माने, योगेश शिंदे, दीपक सकपाळ, बिपीन सावंत आणि राजापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक उल्हास खडपेगुरुजी यांची मोलाची मदत झाली.’ असे अंजय धनावडे यांनी सांगितले.

    लेणींमधील चारपैकी तीन गर्भगृहांमध्ये अधिष्ठानावर शिवलिंग असून, ते शिस्ट किंवा ग्रॅनाइट प्रकारच्या दगडापासून बनविले आहे. यातील लेणीवजा दोन मंदिरांच्या छतावर लाकडी तुळयांसारखा भाग असून, लाकडात उभारल्या जाणाऱ्या मंदिरांची ती नक्कल आहे. या वैशिष्ट्यांवरून ही लेणी कदाचित तिसऱ्या-चौथ्या शतकातील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दृष्टीने कोकणाचा अभ्यास अधिक सूक्ष्म पद्धतीने करणे गरजेचे आहे. हे कोकणातील पाशुपत संप्रदायाचे महत्त्वपूर्ण आणि प्रभावी केंद्र असावे.
    – डॉ. अंजय धनवडे, पुरातत्त्वज्ञ आणि इतिहास अभ्यासक

    बारसुच्या सड्यावर सापडलेले कातळशिल्प हे जगातील इंडस व्हॅली – हडप्पा , मिश्र – इजिप्त , मेसोपोटेनिया – इराण इराक , व चायना या अतिप्राचीन संस्कृतीचा उगम सांगणारे अश्मयुगीन कातळशिल्प हे इतर ठिकाणी अन्य पृष्ठभागावर (धातूचे शिल) सापडणाऱ्या चित्रांचे विस्तृत रुप असुन ते जांभ्या दगडाच्या कातळावर गेली हजारोवर्ष स्थित आहे. त्यामुळे भविष्यात राजापूर हे मानवी इतिहासाच्या अभ्यासाचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

    या लेण्यांचा अभ्यास करताना डॉ . अंजय धनावडे यानी या परिसरातील काही निरीक्षणे नोंदवली आहेत .

    – राजापूर हे कोकणातील बंदर असून, समुद्रामार्गे येणारा व्यापारी माल अर्जुना नदीच्या अंतर्गत भागात राजापूरपर्यंत येत होता. येथून तो घाटमाथ्यावर कोल्हापूर परिसरात जात होता. या मार्गावर उभारलेली शैव लेणी ही येथील स्थानिक राज्यकर्त्यांच्या मदतीने व्यापाऱ्यांनी उभारली असावीत.

    – राजापूर हे शैव केंद्र असून ते तेथील धुतपापेश्वर या शिवमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या लेण्यांवरून पाचव्या आणि सहव्या शतकापासून हा परिसर शैव केंद्र म्हणून प्रसिद्ध आसावा.

    – या काळात कोकणात त्रैकुटक या राजघराण्याची आणि नंतर मौर्य घराण्याची सत्ता होती. या लेणी या राजघराण्यातील लोकांनी दिलेल्या आश्रयाने निर्माण झाल्या असाव्यात.

    – भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आतापर्यंत आढळून आलेल्या या सर्वांत प्राचीन शैवपंथी हिंदू लेणी ठरण्याची शक्यता आहे.