
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या लोकसभेचा खासदार निवडून देणं महत्वाचे आहे. कोण कुठे लढणार याला महत्व नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा महायुती, एनडियेचीच निवडून आली पाहिजे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : उद्योग मंत्री उदय सामंत यांची इच्छा आपल्या भावाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक लढवावी अशी असेल तर तुम्ही शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर राहून भाऊ किरण सामंत यांना भाजपमध्ये पाठवा. मग आमचे पक्ष श्रेष्ठी विचार करतील आणि कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवू. मग कोणच दुखावणार नाही. किरण सामंत हे माझ्या माहितीत कोणत्याच पक्षाचे नाहीत त्यामुळे त्यांनी भाजप मध्ये यावे. मग त्यांचा विचार पक्षश्रेष्ठी करतील,असा नवा प्रस्ताव भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ठेवला आहे.
उदय सामंत हे आमच्या महायुतीचे नेते आहेत. जबाबदार मंत्री सुद्धा आहेत त्यांनी दावे किंवा आपआपसात टीका टिप्पणी करु नये. महायुतीच्या बैठका होणार आहेत. ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. ही जागा कोणाला मिळणार हे आज जाहीर करण्याचा कोणालाच अधिकार नाही. कारण पक्षाच्या फोरम वर ही चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या लोकसभेचा खासदार निवडून देणं महत्वाचे आहे. कोण कुठे लढणार याला महत्व नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा महायुती, एनडियेचीच निवडून आली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही काही भूमिका मांडली आहे. आम्ही काही आकडे वारी मांडली आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भूमिका मांडली आहे. आमच्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आमच्यावर आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही कळवले आहे. त्यामुळे मला वाटते की मंत्री उदय सामंत यांनी घाई करू नये. आपल्या पक्षाच्या आणि महायुतीच्या बैठका होतील, त्यानुसार पुढील काळात निर्णय होईल, असे आ.नितेश राणे यांनी सांगितले.