रवी राणांचे ठाकरेंवर गंभीर आरोप; अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडून वसुली

महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता काळात अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना एकसूत्री कार्यक्रम देण्यात आला होता. यानुसार, राणा दाम्पत्यावर जेवढे गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल करण्याचे आणि कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

    अमरावती : अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह (Amravati Police Commissioner Aarti Singh) या ठाकरे सरकारसाठी वसूली करत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत अवैधपणे केलेली वसुली (Illegal Recovery) पाठवली असल्याचा आरोप अमरावतीचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला आहे. आरती सिंह यांच्याविरोधातील ऑडिओ क्लिप सीआयडीला (CID) योग्य वेळी देऊ. आरती सिंग यांनी दर महिन्याला अमरावतीमधून सात कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.

    आमदार रवी राणा म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता काळात अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना एकसूत्री कार्यक्रम देण्यात आला होता. यानुसार, राणा दाम्पत्यावर जेवढे गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल करण्याचे आणि कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. महापालिका आयुक्तांवर शिवप्रेमींनी शाईफेक केली. त्यावेळी मी अमरावतीत उपस्थित नसतानाही गुन्हा दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला. तेव्हा माझ्या घरी पोलीस पाठवून नजरकैदेत ठेवले. आमच्या कार्यकर्त्यांनाही तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते, असे राणा म्हणाले.

    पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप करताना आमदार रवी राणा यांनी म्हणाले की, पोलीस आयुक्त सिंह यांनी वसुली पथक नेमले होते. या वसुलीमुळेच अमरावतीत गुन्हे वाढले. शहरात दंगल झाली. उमेश कोल्हे यांची हत्या झाली. अमरावतीत गुन्ह्यांची संख्या वाढली असल्याचा आरोप राणा यांनी केला.

    आमच्या विरोधात दाखल केलेले खोटे गुन्हे आणि आरती सिंग यांनी केलेली अवैध वसुली यासंदर्भात तपास सीआयडीकडे देऊ. आमच्याकडे त्या संदर्भात पुरावे असून ऑडिओ क्लिपिंगसुद्धा आहे. हे सगळे पुरावे योग्य वेळी सीआयडीला देणार असल्याचे राणा यांनी सांगितले.