
आपसात भांडणे लावून संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला.
ठाणे : आपसात भांडणे लावून संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचारांपासून आणि हिंदुत्वापासून दूर ठेवण्याचे काम राऊत यांनी केले, असा दावाही त्यांनी केला.
संजय राऊत यांनी नगरसेवकाची निवडणूक लढून जिंकून दाखवावी. आमदारांमुळे राऊत हे निवडून आले आहेत. आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा होता, तेव्हा राऊत यांची भूमिका काय होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर तुम्ही उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याबद्दल काय बोललात ते सांगा, तुमची त्यावेळची भूमिका काय होती ती सर्वांना कळू द्या. कुलदैवताची शपथ घेऊन सांगा हे खोटे होते नाहीतर काही दिवसांत आम्ही सर्व लोकांसमोर आणू, असे आव्हानही त्यांनी राऊत यांना दिले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पूर्वनियोजित दौरा होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांची बैठक घेऊन 22 जागांचा आढावा घेतला. त्याचा या दौऱ्याशी काहीही संबंध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका जिंकणे, हाच सर्वांचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.