
जुलै महिन्यापासून रोखून धरण्यात आलेले पाणी जर पुढील पाच दिवसात दिले नाही तर मी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि स्वतः पाणी सुरू करेन.
वसई-विरार : तहानलेल्या वसई-विरारकरांसाठी मी अंगावर पहिली केस घेण्यासाठी तयार असल्याचे शर्मीला ठाकरे यांनी विरारमध्ये येऊन सरकारला ठणकावले आहे. माझ्यावर आजवर एकही केस नाही. परंतु वसई विरारच्या पाण्यासाठी मी आंदोलन करून पहिली केस घ्यायला तयार आहे. पुढील ५ दिवसात जर वसई विरारला पाणी दिलं नाही तर आम्ही कायदा हातात घेऊन पाणी सुरू करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
केवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे वसई-विरारकरांना पाच महिने पाण्यावाचून तडफडत ठेवण्यात आल्यामुळे मनसेने जाब विचारण्यासाठी वसई विरार महापालिकेवर शुक्रवारी दुपारी मोर्चा काढला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मीला ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. वसई विरार शहराला सुर्या पाणी प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्यात येणार आहे. मात्र जुलै महिन्यापासून हे पाणी रोखून धरण्यात आले आहे. पंतप्रधानांनी काल दुसऱ्या शहरातील धरणाचे उद्घाटन केले. मात्र अद्याप वसई विरार शहराला पाणी दिलेले नाही. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण भरली आहेत. मात्र वसईकर नागरिक तहानलेले आहेत.
जुलै महिन्यापासून रोखून धरण्यात आलेले पाणी जर पुढील पाच दिवसात दिले नाही तर मी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि स्वतः पाणी सुरू करेन. असे शर्मिला ठाकरे यांनी यावेळी सरकारला ठणकावले. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझ्यावर एकही केस नाही. मात्र वसई विरारच्या नागरिकांसाठी मी आंदोलन करून पहिली केस घेण्यासाठी तयार आहे असेही त्यांनी सांगितले. या मोर्च्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मनसेची आक्रमक भूमिका पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.