
शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपद मिळेल या आशेने ते शिंदे गटात आहेत, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होईल उद्या होईल सांगितलं जात आहे. मात्र, हा विस्तार काही होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्यात स्थान नाही मिळालं तर आमदार नाराज होतील म्हणून हा विस्तार केला जात नाही का?
मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde fadnavis government) दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्यानं, रखडल्यानं शिंदे गटातील आमदारांमध्ये दिवसेंदिवस खदखद व नाराजी वाढत चालली आहे. सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेतून (shivsena) शिंदे गटाने (Shinde Group) बंड करत राज्यात भाजपासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आहे. त्यानतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेतून ३९ आमदार आणि त्यानंतर १२ खासदार बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली असून, आमदार, खासदारांसह नगरसेवक, पदाधिकारी (MLAs, MPs, corporators and officers) यांनी देखील शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. दरम्यान, राज्यातील मंत्रिमंडळात शिंदे गटातील ९ आमदारांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. त्यानंतर आता केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, यात शिंदे गटातील तीन खासदारांना संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
…तर आमदार जातील
दरम्यान, शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपद मिळेल या आशेने ते शिंदे गटात आहेत, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होईल उद्या होईल सांगितलं जात आहे. मात्र, हा विस्तार काही होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्यात स्थान नाही मिळालं तर आमदार नाराज होतील म्हणून हा विस्तार केला जात नाही का? असं सांगितलं जात आहे. मात्र, हा दावा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी फेटाळून लावला आहे. या चर्चेत काही तथ्य नाही, असं सांगतानाच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शंभर टक्के होणारच आहे, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
आम्ही सगळे लोक मंत्री झाल्यासारखे आहोत
पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, आम्ही सगळे लोक मंत्री झाल्यासारखे आहोत, ही भावना घेऊन जे आमदार काम करतात त्यांची विनाकारण बदनामी करायची, त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं हे खरोखर चुकीचं आहे, असं दीपक केसरकर म्हणाले. योग्य वेळेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी प्रवक्ता म्हणून निश्चितपणे देईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पूर्वी सुद्धा अनेक वेळा असं घडलं. त्यांच्या काळात आमच्यापेक्षा जास्त काळ पहिला विस्तार झाला नव्हता. दुसरा विस्तार तर दोन दोन वर्षे झाला नव्हता. आम्हाला फक्त सहा महिने झालेत. आमचं पहिलं कर्तव्य लोकांना न्याय देणे हे आहे.
शिंदे गटात आमदारांची नाराजी?
राज्य मंत्रिमंडळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार तब्बल 39 दिवसानंतर झाला. म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी भाजपातील व शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदारांना मंत्रिपदं देण्यात आली. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होऊन चार महिने उलटल्यानंतरही दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये दिवसागणिक नाराजी वाढत आहे. परिणामी हे नाराज आमदार मंत्रीपद न मिळाल्यामुळं शिंदे गटातून फुटणार का? या आमदारांमध्ये खदखद व नाराजी असल्यानं शिंदे गटात विस्फोट होणार का? अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
काय म्हणाले मंत्री?
दरम्यान, तर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना विस्ताराबाबत विचारले असता, काही संतुष्ट लोक धुसफूशीबद्दल बोलत असतात. मात्र आमच्यात कुणीही नाराज नाही. मंत्रिमंडळ विस्तार पण लवकरच होईल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. आम्हाला शिंदे गट म्हणून नका. आम्ही वेगळा शिंदे गट स्थापन केलेला नाही. बाळासाहेबांची शिवसेना हा आमचा पक्ष आहे, असंही सामंत म्हणाले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना वाटेल त्यावेळेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.
गुडघ्याला बांशिंग?
मंत्रिपदासाठी अनेकजणांनी गुडघ्याला बांशिंग बांधून बसले आहेत, अशी टिका विरोधकांनी केली आहे. मंत्रिपदासाठी शिंदे गटातील व भाजपातील अनेकजण इच्छुक आहेत. दरम्यान, दुसरा मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या आधी होईल, असं बोललं जात होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीनंतर व अमित शहांच्या बैठकीनंतर जानेवारी महिन्याच्या अखेरीस विस्तावराचा मुहूर्त मिळल्याची चर्चा आहे. दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेला आहे, परिणामी शिंदे बंडाळी गटातील नाराज आमदारांची अस्वस्थता वाढली आहे. अस्वस्थता दूर करण्यासाठी काही आमदारांना विविध महामंडळावर वर्णी लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सुरु आहे.
खदखद वाढतेय…
आम्ही कुणीही मंत्रिपदासाठी इच्छुक नाही. पण मंत्रिमंडळ विस्तारासाठी इतका वेळ चांगला नाही. सहा महिने निघून गेले आहेत, आम्ही फडणवीस आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की लवकर मंत्रिपदाचा विस्तार करावा, असं संजय गायकवाड म्हणाले. तर जनतेमधील संभ्रम दूर करायला हवा. फूल काढायचे, खिशात ठेवायचे, पुन्हा काढायचे असे करू नका. काही तांत्रिक बाबी असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगून टाकावे. अमूक एक तांत्रिक अडचणीमुळे विस्तार होऊ शकत नाही. सगळ्या ५०-६० आमदारांपैकी काहीही होणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले. तर दुसरीकडे आमदार संजय शिरसाट यांनी देखील मंत्रिमंडळ विस्तार आता झाला पाहिजे असं शिरसाट म्हणालेत. मात्र मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं सत्ताधारी आमदारांमध्ये नाराज वाढत चालल्यानं यांच्यात स्फोट होईल, असं बोललं जात आहे.
केंद्रातील मंत्रिमंडळ रखडला…
केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील तीन खासदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. या तीन मंत्रिपदात एक कॅबिनट व दोन राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर म्हणजे रखडल्यामुळं शिंदे गटातील खासदारांचे टेन्शन वाढले असून, राज्यातील आमदारांप्रमाणे खासदार देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे.