सुरज पांचोलीची निर्दोष मुक्तता; जिया स्वतःच्या भावनांवर आवर घालण्यास अपयशी; सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाचे निरीक्षण

दिवंगत बॉलीवूड अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) स्वतःच्या भावनांवर आवर घालण्यास अपयशी ठरली त्यासाठी सुरज पांचोलीला (Sooraj Pancholi) जबाबदार ठरवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवून जियाच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीची विशेष न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष सुटका केली.

    मुंबई : दिवंगत बॉलीवूड अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) स्वतःच्या भावनांवर आवर घालण्यास अपयशी ठरली त्यासाठी सुरज पांचोलीला (Sooraj Pancholi) जबाबदार ठरवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवून जियाच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीची विशेष न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष सुटका केली.

    कोणत्याही मुलीने आत्महत्या करणेह दुदैवी आहे. याप्रकऱणी जिया तिच्या भावनांचा बळी पडली होता. ती तिच्या भावनांना आवर घालू शकली नाही. ती त्यांच्या नातेसंबंधातून अकडूनच राहिली त्यातून बाहेर पडू शकली असती. पण तसे झाले नाही. जिया तिच्या भावनांना बळी पडली यासाठी आरोपीला (सुरज) जबाबदार धरता येणार नाही. तसेच आरोपीविरोधातील पुरावे हे संदिग्ध, साधारण आहेत. जियाला आत्महत्या करण्यास सुरजने भाग पाडले असे सिद्ध कऱणारे कोणतेही ठोस पुरावे याचिकाकर्ते मांडू शखले नाहीत, असे निरीक्षण विशेष न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी ५१ पानी आदेशात नोंदवले.

    जिया खानने ३ जून २०१३ रोजी आत्महत्या केली होती. जियाने अभिनेता सूरज पांचोलीसोबतच्या तिच्या नात्याचे वर्णन करणारे ६ पानांचे मृत्यूपत्र लिहिले होते. याच आधारे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांनी सुरज पांचोलीला अटक केली होती. १ जुलै २०१३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सुरजची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर जियाची आई राबिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) किंवा केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. आपल्या मुलीचा मृत्यू आत्महत्येने झाला नसून हत्या झाल्याचा दावा त्यांनी केला होता. २०१४ रोजी उच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे वर्ग केला. डिसेंबर २०१५ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात सीबीआयने पंचोलीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. त्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांसमोर मार्च २०१९ मध्ये प्रकरणाची सुनावणी सुरू झाली सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून २० एप्रिल रोजी निकाल राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी न्यायालयाने जाहीर केला.

    सुरजने जियाला नैराश्यातून बाहेर येण्यास मदत केली

    पांचोलीने जियाला नैराश्यातून बाहेर येण्यास याआधी मदत केली होती, परंतु दुर्दैवी घटनेदरम्यान, तो कामात व्यग्र होता. त्यामुळे तो जियाला वेळ देऊ शकला नाही, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आणि जियाची आई आणि मुळ तक्रारदार राबिया यांच्या परस्परविरोधी विधानांवर शंका उपस्थित केली. त्यांनी प्रकरण आत्महत्येचे असतानाही हत्या असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी काही पुरावेही सादर केले. तज्ज्ञांनी जियाच्या मृत्यूचे कारण आत्महत्या सांगितले होते. मात्र राबिया यांनी परस्परविरोधी केलेल्या तक्रारीमुळे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांवरही संशय निर्माण झाला होता. राबिया यांनी स्वतः व्यतिरिक्त सर्वांवरच शंका उपस्थित केल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. तसेच २००८ मध्येही जिया तणावात होती आणि त्यावर उपचार घेत होती. याआधीही जियाने आत्महत्या करण्याच प्रयत्न केला होता त्यावेळी सुरजनेच डॉक्टरांना बोलवून नैरश्यातून बाहरे काढले होते. याकडेही दुलर्क्ष करून चालणार नाही. असेही आदेशात म्हटले आहे.

    पत्रावरही न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

    सीबीआय न्यायालयाने जियाने लिहिलेल्या कथित पत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिया आणि सुरजाच्या बिघडलेल्या नात्याबद्दल याआधी त्यांनी कोणाकडेही तक्रार केली नव्हती. जियाच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी राबियाला तिच्या स्वत:च्या दैनंदिनीत कथित पत्र `अचानक” सापडल्याचे न्यायालयाने नमूद केले. पुढे, जेव्हा हे पत्र चौकशीसाठी मागितले तेव्हा राबियाने ते देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी ते माध्यमांमध्ये प्रकाशित केले. मृत्यूच्या ४ दिवसानंतर हे पत्र सापडल्याच्या प्रश्नावर राबियांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे कथित पत्राच्या मूळ अथवा खऱ्या कर्त्याबाबत (लिहिणाऱ्या व्यक्ती) गंभीर संशय निर्माण होतो असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

    राबियांच्या वागणुकीवरही शंका

    राबियाच्या म्हणण्यानुसार, जिया एक आनंदी मुलगी होती, तिच्या बॉलीवूड कारकिर्दीसाठी आनंदी होती आणि ती कधीही आत्महत्या करू शकत नाही. तथापि, जियाला कधीही मोठा बॅनरचा चित्रपट मिळाला नाही. ती चित्रपटसृष्टीत चांगल्या भूमिकेसाठी झगडत होती. तिने केलेल्या कामाबद्दल आनंदी नव्हती, असे जियासोबत चित्रपटात काम करणाऱ्यांनी नोंदवलेल्या जबाबामध्ये सांगितले होते. दुसरीकडे, जियाच्या मृत्यूनंतर लगेचच राबियाने तिच्या दुसऱ्या मुलीचे मुंबई येथे लग्न पार पाडले. अशा दुःखाच्या परिस्थितीत देखील असा सोहळा साजरा करणे ही वागणूक एखाद्या सामान्य व्यक्तीसारखी दिसत नाही, असेही न्यायालयाने आदेशात अधोरेखित केले आहे.