शेतकऱ्यांना वाटा नसेल तर इथेनॉल बंद करा , राजू शेट्टी यांचा इशारा; वारणेवर आक्रोश पदयात्रा

थेनॉलच्या उत्पादनाचा वाटा शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर ते बंद करा, साखर कारखानदारांनी ७० टक्के शिल्लक साखर मार्चनंतर चढ्या दराने विकली त्यामुळे साखरेच्या चढ्या दराचा ४०० रुपये फरक शेतकऱ्यांना दिल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

    वारणानगर :  इथेनॉलच्या उत्पादनाचा वाटा शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर ते बंद करा, साखर कारखानदारांनी ७० टक्के शिल्लक साखर मार्चनंतर चढ्या दराने विकली त्यामुळे साखरेच्या चढ्या दराचा ४०० रुपये फरक शेतकऱ्यांना दिल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेली आक्रोश पदयात्रा मंगळवारी रात्री वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा सहकारी साखर कारखान्यावर पोहचली. शेतकरी भवन समोरील सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे,  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शेट्टी यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी कारखाना संचालकांना निवेदन दिले.
    स्वागत संचालक रवींद्र जाधव, शहाजी पाटील किशोर पाटील यांनी  केले. त्यानंतर निवेदन स्वीकारले. यावेळी संचालक सुभाष जाधव, विजय पाटील  तोडकर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अजित पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

    पाच हजार रुपये दर अपेक्षित
    शेट्टी म्हणाले जागतिक बाजारपेठेत सध्या साडे सहा हजार रुपये क्विंटल साखरेला दर आहे, मात्र केंद्र शासनाने निर्यात बंदी केली आहे. जर साखर कारखानदार व राज्य शासनाने निर्यात बंदीबाबत केंद्राकडे आवाज उठवला असता तर देशातील कारखान्यांच्या साखरेला पाच हजार रुपये क्विंटल दर मिळाला असता. पाच वर्षापूर्वी एफआरपीनुसार ऊसाचा दर २८०० रूपये टन होता. यात केवळ २०० रूपये वाढ झाली आहे, असे सांगितले.

     मुल्यांकन मनमानी व फसवे
    कारखान्यांनी शिल्लक साखरेचे मुल्यांकन मनमानी व फसवे दिले आहेत. याची चौकशी व्हावी. इथेनॉल निर्मिती करताना एक टक्का रिकव्हरी जाते. त्या उत्पादनाचा वाटा शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर  इथेनॉल कशाला पाहिजे ? ते बंद करा व साखर निर्मिती करा त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, असे शेट्टी यानी सांगितले.