chitra wagh and sushma andhare

एका उर्फी जावेदच्या मागे लागण्यापेक्षा महिलांना सार्वजनिक ठिकाणी ज्या अत्याचाराचा, समस्यांचा सामना करावा लागतो, त्यावर त्यांनी बोलावं, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी दिली आहे.

    भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi javed) यांच्यात वाद सुरू आहे. चित्रा वाघ या उर्फीच्या कपड्यांवरून टीका करत आहेत. तसेच त्यांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे. अशातच काल ‘उर्फी जावेद मला भेटली, तर तिच्या थोबडीत मारेन’, असं विधान चित्रा वाघ यांनी केलं होतं. दरम्यान यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare On Chitra Wagh) यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

    “सार्वजनिक ठिकाणी महिलांशी छेडछाड झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यावर चित्रा वाघ यांनी बोलायला हवं. तो जास्त महत्त्वाचा विषय आहे. एका उर्फी जावेदच्या मागे लागण्यापेक्षा महिलांना सार्वजनिक ठिकाणी ज्या अत्याचाराचा, समस्यांचा सामना करावा लागतो, त्यावर त्यांनी बोलावं”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.

    त्या पुढे म्हणाल्या की,“महिलांचा राजकीय फायद्यासाठी वापर करणाऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करू नये. खरंतर महाविकास आघाडीने ज्या मंत्र्याचा राजीनामा घेतला. त्यांनाच भाजपाने मंत्रीमंडळात सामावून घेतलं आहे. त्यामुळे आता जर संजय राठोड निर्दोष असतील, तर प्रश्न असा निर्माण होतो, की पुजा चव्हाणला तुम्ही बदनाम केलं का? पीडितेचं नाव घेऊ नये, असा आपल्याकडे अलिखित नियम आहे, मग केवळ राजकीय शिड्या मजबूत करण्यासाठी तुम्ही एका भटक्या विमुक्त समजातील मुलीच्या अब्रुचं तुम्ही खोबरं उधळलं, त्याचं काय? यावर बोललं जात नाही”, असे त्या म्हणाल्या.

    “असंख्य मुलींची नावं सांगता येईल, ज्यावर सोयीचं मौन पाळलं जातं. कोणता मुद्दा उचलायचा हे ठरवण्यासाठी आधी त्याची जात कोणती, धर्म कोणता, त्याचा पक्ष कोणता, त्याचा वैचारिक दृष्टीकोन काय आहे? हे तपासलं जातं आणि त्यानंतर त्याला टार्गेट केलं जातं. हे दुर्दैवी आहे”, असं त्या म्हणाल्या.