Ministry of Maharashtra, Mumbai
महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई

Maharashtra Officer Transfer : महसूल विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांना मनाप्रमाणे पोस्टींग पाहिजे, त्यामुळे बदलीच्या ठिकाणी कामावर हजर न राहण्याचा पराक्रम चांगलाच अंगलट आला आहे. मागील सहा महिन्यांपासून कामाच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या अधिकांऱ्यांवर आता सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. एप्रिलमध्ये बदलीच्या नोटीस काढूनही अनेक अधिकारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी हजर झालेले नव्हते. त्यांचे आता निलंबन करण्यात आले आहे.

    मुंबई : बदली झाल्यानंतरही कामावर रुजू न झालेल्या महसूल विभागातील 11 अधिकाऱ्यांवर (Maharashtra Revenue Department Officer Suspension) निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. कामावरती रुजू होण्यासाठी या अधिकाऱ्यांना एप्रिलपासून अनेकदा कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेल्या होत्या. मात्र, या अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद न आल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागाने अधिकाऱ्यांना थेट गर्भित इशारा दिलेला पाहायला मिळतोय.  मात्र वर्षानुवर्ष अनेक अधिकारी क्रीम पोस्ट वर राहतात. यांचाही प्रश्न आता ऐरणीवर आलेला पाहायला मिळत आहे.
    आपल्या आवडीप्रमाणेच पोस्टिंग मिळाली पाहिजे
    आपल्या आवडीप्रमाणेच पोस्टिंग मिळाली पाहिजे हा अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नेहमीच आग्रह पाहायला मिळतो. यासाठी ते मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या माध्यमातून मनासारखी पोस्टिंग मिळवण्यासाठी कसरत करीत असतात. हीच कसरत महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांची ही सुरू होती. मात्र महसूल विभागाने या अधिकाऱ्यावर कारवाईचा चांगलाच बडगा उगारलेला  पाहायला मिळतोय. बदली झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर 11 अधिकारी कामावर रुजू झाले नाही. या सर्वांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेले पाहायला मिळत आहेत.
    35 अधिकारी कामावर  रुजू झालेले नव्हते
    एप्रिलमध्ये महसूल विभागातल्या बदल्या झाल्यानंतर जवळपास 35 अधिकारी कामावर  रुजू झालेले नव्हते. यावेळी अनेकदा महसूल विभागाकडून त्यांना रुजू होण्यासाठी नोटीस काढल्या होत्या. त्यातील अनेक अधिकारी कामावर रूजू झाले. मात्र  अधिकारी अद्याप ही रुजू झाले नाही. अखेर या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
    निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांची यादी
    राज्यात मुंबई, पुणे, अमरावती , औरंगाबाद नागपूर  आणि नाशिक असे सहा महसूल विभाग आहेत. या महसुली विभागापैकी नागपूर आणि अमरावतीसाठी अधिकारी रुजू हेण्यास  शक्यतो तयार होत नाहीत. त्यामुळे नागपूर विभागात रुजू न होणाऱ्या सात तहसीलदारांना निलंबित करण्यात आल आहे.
    – विनायक थविल- (वडसादेसांगज- गडचिरोली)
    – सरेंद्र दांडेकर (धानोरा गडचिरोली)
    – बी.जे. गोरे (ऐटापल्ली गडचिरोली)
     – पल्लवी तभाने (संजय गांधी योजना वर्धा)
    – सुनंदा भोसले -(खरेदी अधिकारी नागपूर)
    – बालाजी सूर्यवंशी -(अप्पर तहसीलदार नागपूर)
    – सुचित्रा पाटील -(करमणूक शुल्क अधिकारी नाशिक).
    तर यवतमाळ जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी अहमदनगर जिल्ह्यात बदली झालेले अभयसिंग मोहिते यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
    काय आहेत बदलीचे नियम?
    बदलीचे नियम जर पाहिले तर जिल्ह्यात बदली झाली असेल तर तीन दिवसात आणि जिल्ह्याबाहेर बदली झाली असेल तर सात दिवसात बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागते. जर अधिकारी रुजू झाले नाही तर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. पर्याप्त कारण असेल तर विभाग ते ग्राह्य धरते आणि पर्याप्त कारण  नसेल तर कारवाई केली जाते. या नियमानुसार महसूल विभागाने अनेकदा या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली असल्याची माहिती समोर आहे.
    आजकाल कोणतीही बदली पाहिजे असेल तर शिफारस पत्र आवश्यक मानले जाते. त्यासाठी अनेक अधिकारी आमदार, खासदार, मंत्री आणि थेट मुख्यमंत्री यांच्या शिफारसीसाठी मंत्रालयात फेऱ्या मारताना पाहायाला मिळतात.
    वर्षानुवर्षे क्रीम पोस्टिंगवर काम करणाऱ्यांचे काय?
    नाण्याच्या दोन बाजू असतात तशा प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात. त्यातील या घटनेतील एक बाजू म्हणजे जे अधिकारी कामावर रुजू झालेले नाही, त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करून या विभागातील अधिकाऱ्यांना थेट इशारा दिलेला पाहायला मिळतोय. मात्र दुसरी बाजू म्हणाल तर ती ही  तेवढीच महत्त्वाची आहे. विशिष्ट अधिकारी विशिष्ट  क्रीम पोस्टिंगवरतीच वर्षानुवर्षे पाहायला मिळतात. त्याचा ही विचार कधी होणार का? हासुद्धा प्रश्न तेवढाच ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय.