Tanaji-Sawant

देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने 3 जानेवारीला राज्यात पहिली बंडखोरी केली. भाजपच्या साथीने धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीची अधिकृत सत्ता स्थापन करण्यात आली. त्यानंतर सलग दोन वर्ष हे सरकार पाडण्यासाठी कामाला लागलो. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत सतत बैठका झाल्या. जवळपास 100 ते 150 बैठका झाल्या,असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.

धाराशिव: आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या विधानामुळे सध्या खळबळ उडाली आहे.  चांगले काम करुनही आपल्याला मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही. त्यावेळीच मातोश्रीची पायरीही चढणार नसल्याची शपथ घेतली. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात जाहीररीत्या पहिली बंडखोरी केली. फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मदतीने धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. शिवसेनेतील आमदारांचं मतपरिवर्तन करण्यास सुरुवात केली. राज्याभरात तब्बल 150 बैठका  घेतल्या. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंने त्यासाठी मोठी साथ दिली. त्यामुळेच ठाकरे सरकार पाडण्यात आपल्याला यश मिळाले असल्याचा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला.

जिल्ह्यातील परंडा येथे भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेदरम्यान सावंत यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी आपण व्युहरचना आखल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल नाकारला. भाजप-शिवसेना युतीला कौल दिलेला असताना शरद पवार यांनी त्यात मिठाचा खडा टाकला.  जनमत डावलून पक्षप्रमुख ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येही आपल्याला स्थान दिले नाही. त्यामुळे मातोश्रीवर जाऊन ‘त्यांना’ सांगून आलो की मी आता पुन्हा या मातोश्रीची पायरी चढणार नाही. त्यानंतर 30 डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार झाला. त्यातूनही उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दूर ठेवले. त्यामुळे संतप्त होऊन आपण देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने 3 जानेवारीला राज्यात पहिली बंडखोरी केली. भाजपच्या साथीने धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीची अधिकृत सत्ता स्थापन करण्यात आली. त्यानंतर सलग दोन वर्ष हे सरकार पाडण्यासाठी कामाला लागलो. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत सतत बैठका झाल्या. जवळपास 100 ते 150 बैठका झाल्या.

या काळात विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या भेटी घेतल्या. त्यांना सगळं स्पष्ट सांगून त्यांचे मतपरिवर्तन केले. सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या या गौप्यस्फोटामुळे ठाकरे सरकार पाडण्याचे कटकारस्थान दोन वर्षांपासून शिजत असल्याचं पहिल्यांदाच समोर आलं आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आपला कसलाही सहभाग नव्हता असा दावा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सतत केला जात होता तो दावाही सावंत यांच्या या गौप्यस्फोटामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.