
सायबर गुन्ह्यांचा फास वाढत चालला असून, आता हे सायबर चोरटे सुशिक्षित बेरोजगारांना टार्गेट करत असल्याचे दिसत आहे. शहरात टेलिग्रामच्या माध्यमातून तीन जणांची तब्बल ५३ लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांकडून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुणे : सायबर गुन्ह्यांचा फास वाढत चालला असून, आता हे सायबर चोरटे सुशिक्षित बेरोजगारांना टार्गेट करत असल्याचे दिसत आहे. शहरात टेलिग्रामच्या माध्यमातून तीन जणांची तब्बल ५३ लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांकडून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जास्त पैशाचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली असून, ‘टास्क’ देऊन हे सायबर चोरटे लाखोंना गंडा घालत आहेत. शहरातील एरंडवणे, कात्रज व मार्केटयार्ड येथील तिघांना फसविले आहे.
याप्रकरणी गौतम शिरीष करजगी (वय ४२) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार टेलिग्राम धारक, विविध बँक खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १४ ते १९ सप्टेंबर २०२३ कालावधीत घडला आहे.
तक्रारदार गौतम यांना टेलिग्रामच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्यांनी टास्क पूर्ण केला. त्याचा नफा त्यांना देत आणखी टास्क देण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. पहिल्या टास्कमध्ये पैसे मिळाल्याने त्यांनी सांगितल्यानुसार २२ लाख रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्यांनी कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली.
दुसऱ्या घटनेत रामकृष्ण साहेबराव चोरगे (वय ३७) यांची फसवणूक झाली असून, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार २३ ते २७ सप्टेंबर २०२३ मध्ये घडला आहे. तक्ररादार भिलारेवाडीत राहण्यास असून, त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून संपर्क साधला. सनटेक डिजिटल कंपनीतून बोलत आहे, असे सांगून एक लिंक पाठवली. तसेच, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याचे पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवले. टेलिग्राम लिंक पाठवून ग्रुपमध्ये जॉईन केले. त्यांना टास्क देत यावर २५ ते ५० टक्के कमिशन देण्याचा बहाणा केला. जास्त परतावा देण्याचे आमिषाने त्यांच्याकडून २२ लाख २३ हजार रुपये पाठवले. मात्र, त्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड तपास करीत आहेत.