वांद्रे-वरळी सी लिंकवर विचित्र अपघात; सह वाहनांची एकमेकांना धडक, तिघांचा मृत्यू, 6 ते 7 जण जखमी

वरळी सी लिंकवर वरळी वांद्रे मार्गाने (Worli-Bandra) एक इनोव्हा कार चार ते पाच वाहनांना धडकून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे

    मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात एक विचित्र अपघात (bandra worli sea link Accident) घडला. वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे परिसरातील वांद्रे-वरळी सी-लिंकवर गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. टोलनाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या चार ते पाच गाड्यांना मागून आलेल्या भरधाव गाडीची धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 6 ते 7 जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहे.

    कसा घडला अपघात?

    वरळी सी लिंकवर वरळी वांद्रे मार्गाने (Worli-Bandra) एक इनोव्हा कार चार ते पाच वाहनांना धडकून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही इनोव्हा कार सर्वात आधी सी-लिंकवर मर्सिडीज गाडीला धडकली. त्यांनतर ती कार टोलनाक्यावर टोल भरत असलेल्या इनोव्हा आणि क्विड गाडीला धडकली. त्यांनतर इनोव्हा गाडीच्या पाठोपाठ होंडा सिटी कारनंही इनोव्हा गाडीला धडक देत, वांद्रा-वरळी सी लिंकवरील टोल नाका 11 आणि 10 वरुन जाणाऱ्या टॅक्सिला धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून 6 ते 7 जण जखमी झाले आहे.

    हनिफ पिर, हमाबीबी पिर, खतीजा हटिया अशी मृतांची नावं आहेत. तर, असीम सदर, ,हजरा सदर, बीबी सदर, राजश्री दवे, राकेश दवे, अशी जखमींची नावं आहेत. अद्याप सर्व जखमींची नावं कळू शकलेली नाही. सर्व जखमींवर मुंबईतील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.