
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Upcoming Loksabha Election) भाजपने कंबर कसली आहे. गेल्या वर्षी शिवसेना आणि यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, या दोन्ही पक्षातून फुटून आलेल्या मोठ्या गटांनी भाजपला दिलेली साथ यामुळे आगामी निवडणूक रंगतदार ठरणार आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Upcoming Loksabha Election) भाजपने कंबर कसली आहे. गेल्या वर्षी शिवसेना आणि यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, या दोन्ही पक्षातून फुटून आलेल्या मोठ्या गटांनी भाजपला दिलेली साथ यामुळे आगामी निवडणूक रंगतदार ठरणार आहे.
जागावाटपापासून तिकीटवाटपापर्यंत सर्वच पातळ्यांवर महायुतीची कसोटी लागणार आहे. केंद्रातील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपला महाराष्ट्रातून मोठी ‘पॉवर’ अपेक्षित आहे. भाजपच्या काही खासदारांवर त्यांचे मतदार, स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत. यामध्ये मुंबईतील खासदार पूनम महाजन, मनोज कोटक यांच्या नावांचा समावेश आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. पैकी तीन जागा भाजपाकडे आहेत. यातील दोन जागांवर भाजप भाकरी फिरवू शकतो.
शेट्टींच्या कामगिरीवर पक्ष समाधान
उत्तर मुंबईचे खासदार असलेल्या गोपाळ शेट्टींच्या कामगिरीवर पक्ष समाधानी आहे. मतदारसंघात शेट्टींची कामगिरी उत्तम आहे. त्यांचा जनसंपर्कदेखील दांडगा आहे. त्यांची लोकप्रियताही चांगली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता जास्त आहे, तर माजी खासदार किरीट सोमय्या सध्या चांगलेच सक्रिय आहे. कोटक यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह असताना सोमय्या सक्रिय आहेत. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघातून सोमय्यांना संधी दिली जाऊ शकते.