
मुंबई : देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची महत्त्वाची आणि तिसरी बैठक उद्या मुंबईतील ग्रॅंड हयात या हॉटेल येथे पार पडणार आहे. यामध्ये देशभरातील सहा राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. अशा वेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षसुद्धा या प्रमुख बैठकील उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी हे तीन प्रमुख पक्ष या सभेला उपस्थित राहणार आहेत. अशा वेळी वंचित बहुजन आघाडीसुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडी का उपस्थित नाही, याचे कारण आपण जाणून घेऊया.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपण आघाडीला का उपस्थित नाही याचे कारण स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना कॉंग्रेसवर रोख धरला. कॉंग्रेस आम्हाला निमंत्रण देत नाही. आमची आणि शिवसेनेची युती आहे. परंतु, आम्हाला कॉंग्रेस बैठकीटे निमंत्रण देत नाही, त्यामुळे आम्ही या आघाडीच्या बैठकीला जात नाही. त्याचबरोबर आमची युती महाविकास आघाडीसोबत नाही, आम्ही शिवसेनेतसोबतच युती केली आहे. त्यामुळे आम्ही आघाडीच्या बैठकीला जाऊ शकत नाही.