आमदार रवी राणा यांची मंत्री अनिल परब यांना दिली ‘या’ झाडाची उपमा

अमरावती विभागीय कार्यशाळेत सुरू असलेल्या आंदोलनाला रवी राणा यांनी आज भेट दिली. प्रत्येक मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर व सरकारवर टीका करणाऱ्या राणा यांनी ही संधीही सोडली नाही. ही टीका करताना त्यांची जीभ घसरली. 'एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी गळफास ......

    अमरावती (Amravati) : एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये (the state government) विलिनीकरण करण्याच्या मागणीसह अन्य काही प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी कामगारांनी (ST workers) गेल्या काही दिवसांपासून संप पुकारला आहे. राज्य सरकार मागण्यांना प्रतिसाद देत नसल्यानं आंदोलन सुरूच आहे. आजही विविध जिल्ह्यांत कामगारांनी निदर्शनं, ठिय्या आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधलं. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून वडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली.

    अमरावती विभागीय कार्यशाळेत सुरू असलेल्या आंदोलनाला रवी राणा यांनी आज भेट दिली. प्रत्येक मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर व सरकारवर टीका करणाऱ्या राणा यांनी ही संधीही सोडली नाही. ही टीका करताना त्यांची जीभ घसरली. ‘एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी गळफास घ्यावा लागतो. आपला जीव द्यावा लागतो तरी या मुख्यमंत्र्यांना शरम वाटत नाही, असं ते म्हणाले.

    राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे बेशरमीच्या झाडापेक्षा सुद्धा बेशरम मंत्री आहेत. त्यांना कर्मचाऱ्यांचं काही घेणंदेणं नाही. भाऊबीजेच्या तोंडावर एसटी महामंडळातील भगिनी रडून आपली व्यथा मांडत आहेत. दिवाळीनिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना फक्त अडीच हजार रुपये बोनस देण्यात आला आहे. एखाद्या खासगी कंपनीपेक्षाही कमी पगारावर ही लोक काम करत आहेत. महाराष्ट्रातील मंत्री, मुख्यमंत्री हे एसटी कर्मचार्‍यांची थट्टा करत आहेत. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या पाहून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, असा संताप राणा यांनी यावेळी व्यक्त केला.