गावात तलावाचं पाणी शिरायचं; पाण्याची दिशा बदलवण्यासाठी महिलांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचून हादराल

तलावाचे आउटलेट मधून पाण्याचा मोठा प्रवाह लोटवाडा गावातील नागरी वस्तीत शिरत असल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत होते. ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा या संबंधात ठराव घेऊन तो जलसंधारण विभागाला देण्यात आला होता. यासह महसूल विभागाला देण्यात आला होता. मात्र,

    अमरावती (Amravati) : दर्यापुर तालुक्यातील (Daryapur taluka) लोटवाडा (lake at Lotwada) येथे असलेल्या गाव तलावाचे पाणी नागरी वस्तीत सतत शिरत असल्याने येथील नागरिकांनी तथा ग्रामपंचायतीच्या वतीने जलसंधारण विभागाला (the Water Conservation Department) अनेक वेळा निवेदने तक्रारी दिल्या. मात्र, ढिम्म प्रशासन कोणतीही कारवाई करायला तयार नसल्याने अखेर सरपंच पंचशीला भीमराव कुराडे (Sarpanch Panchshila Bhimrao Kurade) यांच्या नेतृत्वात तथा सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुराडे यांच्या मार्गदर्शनात लोटवाडा येथे आज गाव तलावतच जलसमाधी आंदोलन (Jalasamadhi agitation) करण्यात आले.

    लोटवाडा येथील नागरिकांनी प्रशासनाला अनेक वेळा विनंत्या केल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नसल्याने व पावसाळ्याच्या दिवसातील गाव तलावाचे आउटलेट मधून पाण्याचा मोठा प्रवाह लोटवाडा गावातील नागरी वस्तीत शिरत असल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत होते. ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा या संबंधात ठराव घेऊन तो जलसंधारण विभागाला देण्यात आला होता. यासह महसूल विभागाला देण्यात आला होता. मात्र, प्रशासन सुस्त पणे काम करत असल्याने अखेर नागरिकांच्यावतीने आज जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

    या आंदोलनात एकूण नऊ नागरिकांनी सहभाग घेतला होता. येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल बच्छाव यांच्या नेतृत्वात पोलिसांचा ताफा या गाव तलावाच्या जवळ उपस्थित झाला. असे असतानाही प्रशासनाची नजर चुकवून आंदोलन कर्ते पहाटेच्या अंधारातच गाव तलावातील जागेवर पोहोचले. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली.

    तहसीलदार योगेश देशमुख, ठाणेदार अमोल बच्छाव, जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वानखडे यासह जिल्हाधिकारी कार्यालयातून रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी पोहोचले. गावकरी आणि नागरिक या गाव तलावाच्याजवळ मोठ्या संख्येने पोहोचले होते. आंदोलनकर्त्यांनी पाण्यात आपला ठिय्या मांडल्याने व जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत पाण्याबाहेर न येण्याचे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला ठामपणे सांगितले.

    यासह आमची मागणी मान्य न झाल्यास महिलांसह खोल पाण्यामध्ये जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर करताच प्रशासन अलर्ट झाले. आंदोलनकर्त्यांनी मागणी पूर्ण झाल्याचे लेखी आश्वासन देईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितल्याने प्रशासनाने जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना आश्वासनाची लेखी पत्र देण्याची विनंती केली. यावर कार्यकारी अभियंता जलसंधारण विभाग यांचे लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतरच आंदोलन समाप्त करण्यात आले. या पत्रानुसार लोटवाडा गावालगत असलेल्या गाव तलावाच्या आउटलेटची दिशा बदलून तथा गावालगत असलेल्या भागाला बुजवून सुरक्षित भिंत उभारण्याचे लेखी अभिवचन देण्यात आले. यावेळी रेस्क्यू टीमच्या माध्यमातून बोटीने गाव तलावाच्या मधोमध असलेल्या महिला आंदोलनकर्त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

    यावेळी प्रशांत वानखडे उपविभागीय जलसंधारण अधिकारी, संदीप कोकडे जलसंधारण अधिकारी, मयूर कराळे, गजानन वडतकर, तहसीलदार योगेश देशमुख, नायब तहसीलदार गाडेकर, ठाणेदार अमोल बच्छाव , पीएसआय वसंत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुराडे उपस्थित होते. आंदोलनात सहभागी लोटवाडा सरपंच पंचशीला कुऱ्हाडे, कोकिळा राजीव रक्षे, सुमित्रा सुभाष रायबोले , सुभाष रायबोले, रमाबाई रायबोले, पंचफुला रायबोले , यांचा सहभाग आंदोलनात होता.