महाराष्ट्रातील बसेसला मध्यप्रदेशात प्रतिबंध; २१ मार्चपासून अंमलबजावणी

महाराष्ट्रासह विदर्भात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला प्रतिबंध केला आहे. तसेच आंतरराज्यीय खासगी बससेवेलाही यामुळे ब्रेक लागणार आहे.

    भंडारा (Bhandara).  महाराष्ट्रासह विदर्भात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला प्रतिबंध केला आहे. तसेच आंतरराज्यीय खासगी बससेवेलाही यामुळे ब्रेक लागणार आहे. मध्यप्रदेश सरकारच्या अपर परिवहन आयुक्तांनी हा आदेश जारी केला असून, त्याची अंमलबजावणी 21 मार्चपासून करण्याचे निर्देशित केले आहे. यामुळे भंडारा-बालाघाट मार्गावरील सात बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

    महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या भंडारा विभागाच्या अनेक बसेस मध्यप्रदेशात जातात. शेकडो प्रवासी एसटी बसने मध्यप्रदेशात जातात. खासगी बसेसचाही उपयोग केला जातो. परंतु, अलीकडे महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मध्यप्रदेश सरकारने खबरदारीची उपाययोजना म्हणून महाराष्ट्रातून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या आणि खासगी बसेसला प्रतिबंध केला आहे. मध्यप्रदेश सरकारच्या ग्वालियर येथील परिवहन आयुक्तांनी 18 मार्च रोजी एक पत्र जारी केले. त्यात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश बससेवा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

    राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात भंडाऱ्यासह गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. या विभागातील विविध आगाराच्या अनेक बसफेऱ्या मध्यप्रदेशासाठी सुरू करण्यात आल्या आहे. बालाघाट, वाराशिवनी मार्गावर अनेक बसेस धावतात. मात्र आता या आदेशामुळे भंडारा विभागातील मध्यप्रदेशासाठी असलेली आंतरराज्यीय बससेवा बंद करावी लागणार आहे. शनिवारी वाराशिवनी येथे जाणारी एसटी बस बफेरा येथे मुक्कामी ठेवली होती. भंडारा विभागातून सात बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र छत्तीसगढ राज्यातील डोंगरगढ मार्गावरील बसेस सुरू असल्याचे सांगण्यात आले. सध्या कोरेाना संसर्ग वाढत असल्याने विविध उपाययोजना केल्या जात आहे.

    छत्तीसगढच्या सीमेवर अँटिजन चाचणी
    महाराष्ट्रातून छत्तीसगढ राज्यात जाणाऱ्या सर्व प्रवाशांची अँटिजन चाचणी केली जात आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगढच्या सीमेवर असलेल्या बाघ नदी परिसरात छत्तीसगढ सरकारने चाचणी केंद्र उभारले आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येते. निगेटिव्ह अहवाल आल्यास छत्तीसगढमध्ये प्रवेश दिला जातो. या ठिकाणी चाचणीसाठी प्रवाशांना एक ते दीड तास ताटकळत राहावे लागत आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही व्यवस्था गरजेची असल्याचे प्रवासी सांगत आहे.