कृषी वीज बिलाच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम देखील माफ करण्यात येत आहे.
बुलढाणा : राज्यातील शेतकरी बांधवाना कृषी पंपाच्या वीज देयकांच्या थकबाकीतून मुक्तता देण्यासाठी शासनाने कृषी पंप वीज धोरण – २०२० योजना आखली असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील १५४९ शेतकऱ्यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्त होण्यासाठी शेवटचे १६ दिवस शिल्लक राहिले आहे. ३१ मार्च हा योजनेत सहभागी होण्यासाठी अखेरचा दिवस आहे. वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलांमधून थकबाकी मुक्त होण्यासाठी शेतकरी बांधवांसाठी ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू केली आहे.
कृषी वीज बिलाच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम देखील माफ करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील थकबाकी मुक्त झालेल्या या शेतकऱ्यांनी थकबाकीची ४ कोटी ७३ लाख रुपयांची रक्कम महावितरणच्या तिजोरीत जमा केली आहे. शेतकर्यांना वीज देयका संदर्भात काही शंका असल्यास यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक उपविभागीय कार्यालयात ३० मार्च पर्यंत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी याचा देखील लाभ घेण्याचे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.