स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणाऱ्या कंगणाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ! : नसिम खान

ब्रिटीश सत्तेला ‘चले जाव’ म्हणत छातीवर शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी गोळ्या झेलल्या, आपले प्राण दिले पण स्वातंत्र्यासाठी ते मागे हटले नाहीत. या सर्वांच्या त्यागामुळे, बलिदानामुळे आपल्याला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर पंडित नेहरुजी यांच्या नेतृत्वाखाली व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे भारत जगात एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून उभे राहिले आहे.

    मुंबई (Mumbai) : भारताला ‘१९४७ साली मिळाले ते स्वातंत्र्य नसून भीक आहे, खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले’, असे बेताल वक्तव्य करुन अभिनेत्री कंगणा राणावत हिने हजारो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. कंगणाचे विधान हा देशद्रोहच आहे. त्यामुळे कंगणा राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसिम खान यांनी साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कंगणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रार दाखल केली आहे.

    यावेळी त्यांच्यासोबत उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष जगदीश आमीन, मो. शरिफ खान, प्रभाकर जावकर, माया खोत आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

    स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेकांचे योगदान
    या संदर्भात नसीम खान म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी मोठा संघर्षपूर्ण व दिर्घ लढा द्यावा लागला आहे. ब्रिटिशांच्या जुलमी, अत्याचारी राजवटीला भारतातून हाकलून लावून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, शहिद भगतसिंग यांच्यासारख्या अनेकांचे योगदान या स्वातंत्र्य लढ्यासाठी राहिले आहे.

    देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पद्मश्री परत घ्या
    ब्रिटीश सत्तेला ‘चले जाव’ म्हणत छातीवर शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी गोळ्या झेलल्या, आपले प्राण दिले पण स्वातंत्र्यासाठी ते मागे हटले नाहीत. या सर्वांच्या त्यागामुळे, बलिदानामुळे आपल्याला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर पंडित नेहरुजी यांच्या नेतृत्वाखाली व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे भारत जगात एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून उभे राहिले आहे. परंतु अभिनेत्री कंगणा राणावतसारख्या काही अविचारी, बेताल व्यक्तीने स्वातंत्र्यसानिकांचा अपमान केला आहे. अशा व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करणे हा पुरस्काराचाही अपमानच आहे. त्यामुळ तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पद्मश्री पुरस्कारही परत घ्यावा अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.